कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलतर्फे कोल्हापुरात ऑर्गन ट्रान्सप्लान्ट क्लिनिक सुरु
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई या आघाडीच्या मल्टी-स्पेशालिटी टर्शरी केयर हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व जाणून, कोल्हापुरातील सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतःचे ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ओपीडी क्लिनिक सुरु केल्याची घोषणा केली आहे. सेंटरच्या उदघाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अवयव प्रत्यारोपणाची गरज सातत्याने वाढत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.यावेळी ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ओपीडी क्लिनिकच्या उदघाटन प्रसंगी, वरिष्ठ ट्रान्सप्लान्ट सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील हेड – अडल्ट कार्डियाक सर्जरी आणि डायरेक्टर – हार्ट अँड लंग ट्रान्सप्लान्ट सर्व्हिस डॉ. नंदकिशोर कपाडिया, कन्सल्टन्ट – एचपीबी आणि लिव्हर ट्रान्सप्लान्ट, डॉ. विनायक निकम,रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लान्ट सर्जन, डॉ. श्याम वर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.यावेळी डॉ.सचिन बामणे उपस्थित होते.
अवयव प्रत्यारोपण ही एक जीवन रक्षक वैद्यकीय प्रक्रिया असून त्यामुळे जगभरातील लाखो लोकांना आशा आणि नवे जीवन मिळाले आहे. कोल्हापुरातील ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ओपीडी क्लिनिक अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांना सर्वसमावेशक देखभाल पुरवण्यासाठी एक समर्पित सुविधा म्हणून काम करेल. महिन्यातून एकदा, सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथील डॉक्टर याठिकाणी उपलब्ध असतील. डॉ. नंदकिशोर कपाडिया यांनी सांगितले, “कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण २०१६ सालापासून केले जात आहे. जगभरात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या तोडीस तोड असलेल्या ‘दा विन्ची सर्जिकल सिस्टिम’सारख्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आम्ही सर्जरीतून सर्वोत्कृष्ट परिणाम मिळवून देऊ शकत आहोत.”
डॉ. कपाडिया पुढे म्हणाले, “भारतात आजवर फक्त १५०० हृदय प्रत्यारोपणे केली गेली आहेत. दरवर्षी ५०,००० रुग्णांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असते पण त्यापैकी फक्त ०.२ टक्के जणांना डोनर मिळणे शक्य होते. म्हणूनच आम्ही अवयव दान आणि प्रत्यारोपणाविषयी जागरूकता मोहीम चालवत आहोत.”
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईतील कन्सल्टन्ट – एचपीबी आणि लिव्हर ट्रान्सप्लान्ट, डॉ. विनायक निकम यांनी लिव्हर ट्रान्सप्लान्ट आणि त्यामुळे कोणत्या स्थितीत जीव वाचवला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली.
डॉ. श्याम वर्मा यांनी सांगितले, “किडनीच्या विकारांमुळे लाखो लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत आणि त्यामुळे आरोग्य देखभाल व्यवस्थेवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देखील अवयव दानाची शक्ती हा आशेचा किरण आहे” शेवटी उपस्थितांचे आभार बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सतिशकुमार दुधानी व मॅनेजर सेल्स श्रीरंग करंदीकर यांनी मानले.