सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर
कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फूट २ इंच इतकी नोंदवली गेली असून तीची वाटचाल आता ३९ फूट या इशारा पातळीकडे चालू आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एकूण ७९ बंधारे पाण्याखाली आहेत. कुडित्रे-कोगे पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वेदगंगा नदीला पूर आल्याने राधानगरी-निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आलमट्टी धरणात सध्या ९८.४१६ टी.एम्.सी. पाणीसाठी असून ६५ सहस्त्र घनप्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या. यात स्वयंसेवक आणि ‘एन्.डी.आर्.एफ्.’ची पथके सज्ज ठेवा, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक आणि जनावरांचे वेळेत स्थलांतर करा, पुराचे पाणी आलेले रस्ते ‘बॅरिकेड्स’ लावून बंद करा यांसह अन्य सूचना दिल्या.