फसव्या, तोतया, बोगस लुटारू वधू वर सूचक टोळीच्या बंदोबस्तासाठी मनसेकडून जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक याना निवेदन दिले जाणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.आजमितीला लाखो तरुण लग्नाच्या उंबरठ्यावर असून अनेकांची वय उलटून गेली आहेत. मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक बोगस वधू वर सूचक मंडळे, अनेक एजंट या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजरोस फसवत आहेत. फसवणूक होऊनही इज्जतीचा पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र वाढत चालले आहेत.याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मनसेचे शहर संघटक सुनील सामंत आणि विभाग अध्यक्ष सचिन साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच बरोबर महाराष्ट्र शासनानेही दखल घेऊन अधिकृत काम करण्यास नोंदणी करणाऱ्यास परवानगी दयावी अशी मागणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आज लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा वाढल्याचेही दिसून येत आहे. याच भावनिक मानसिकतेचा गैरफायदा घेत ही तोतया, बोगस, लुटारू वधू वर सूचक टोळी सोकावली आहे. अशा फसव्या लुटारू टोळीच्या मुसक्या आवळल्या जाव्यात व अशा प्रकारांना कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मनसेने एल्गार पुकारला आहे असे यावेळी सांगण्यात आले.यात पालकांनी ही पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना नवरी मुलगी मिळणं कठीण झालं आहे.. त्यात मुलांच्या तुलनेत मुलींचं उच्चशिक्षित असण्याचे प्रमाण वाढले असल्यानं त्यांच्या अपेक्षेत स्थळं उपलब्ध होत नसल्याने गरजू विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींचे डमी फोटोज् आणि बायो डेटा तयार करून पैसे उकळण्याचा फंडा वापरला जात आहे.तोतया , फसव्या, बनावट, बोगस लुटारू वधू वर सूचक टोळीना पायबंद घालण्यासाठी मनसेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार करून अशा प्रकारच्या वधू वर सूचक मंडळावर बंदी घालावी.. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.त्याच निवेदनाची प्रत माहितीसाठी गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठवली जाईल.याचाच पहिला भाग म्हणून मनसेच्या वतीने येत्या मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.आजवर फसलेल्या वधू वर पालकांना संघटित करून न डगमगता त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात.. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असे यावेळी सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेला सौ. मनीषा घाटगे, दिशा मांडवकर, राहुल पाटील, महेश कदम, राहुल नाईक, सत्यजीत मिरजकर, प्रसन्न वरखेडकर, सर्जेराव कुंभार आदी पदाधिकारी सहभागी होते.