Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याशाश्वत विकास परिषदेतून जिल्ह्यातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल...

शाश्वत विकास परिषदेतून जिल्ह्यातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर

शाश्वत विकास परिषदेतून जिल्ह्यातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर

जिल्हाधिकारी कार्यालयात परिषदेच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्थानिक अर्थ चक्र बदलत आहे. राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूर येथे होत असून यातून जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल असे प्रतिपादन कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, राजेश क्षीरसागर यांनी केले. २५ जून रोजी होणाऱ्या परिषदेच्या अनुषंगाने तयारीबाबत राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. २५ जून रोजी सयाजी हॉटेल मधे विक्टोरिया सभागृहात सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत वेगवेगळे विषय घेऊन शाश्वत विकासाबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी या परिषदेतून मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार आणि घोषणाही होणार आहेत. त्या परिषदेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, स्थानिक आमदार, खासदार यांचेसह राज्यस्तरावरून त्या त्या विभागाचे प्रधान सचिव, सचिव, व्यावसायिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मनोगत नंतर मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रास्ताविक करतील व नंतर ५ भागात चर्चासत्र होणार आहेत. यात फाउंडरी आणि इंजीनियरिंग, टेक्स्टाइल, आयटी, टुरिझम आणि फ़ूड प्रोसेसिंग असे विषय असणार आहेत. शेवटी विविध उद्योग व्यवसायाशी निगडित सामंजस्य करार होतील व कोल्हापुरच्या अनुषंगाने घोषणा होतील.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, तसेच सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन यूएस डॉलर करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या अनुषंगाने विकासाचे केंद्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत व आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.कोल्हापूर जिल्ह्यास केंद्रस्थानी ठेवून जिल्हाचे विकास धोरण व विशिष्ट नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सामूहिक, संस्थात्मक आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे प्रयत्न केले पाहिजेत. याकरिता “महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (मित्र) संस्था, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कोल्हापूर येथे शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्ह्यातील आर्थिक विकासाच्या संभाव्य क्षेत्राची क्षमता विचारात घेऊन आर्थिक विकास तसेच इतर विकासात्मक बाबी निवडक प्राधान्यकृत क्षेत्रांमध्ये (वस्तु निर्माण-फाउंड्री अँड इंजीनियरिंग, वस्त्रोद्योग, पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन व अन्न प्रक्रिया) कार्यरत असणारे भागधारक, तज्ञ, उद्योजक, अभ्यासक या सर्वांसोबत शासन विकासाबाबत विचारविमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्याकरिता या शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात त्यांनी सांगितले.
ही परिषद धोरणकर्ते, सरकार यांच्यात कल्पना, व्यवसायाच्या संधी, सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ असेल. सहभागी अधिकारी, तज्ञ, उद्योगपती, गुंतवणूकदार, इतर भागधारक जे भविष्यातील संधींसह आपल्या जिल्ह्यासमोरील विविध विकासात्मक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments