Thursday, June 26, 2025
spot_img
Home Blog Page 2

हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत महापालिका आयुक्तांना दिले पत्र

0

हद्दवाढ नैसर्गिक प्रक्रिया, शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठीच हद्दवाढ महत्वाची : ग्रामीण भागातील जनतेने भूमिका समजून घेण्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत महापालिका आयुक्तांना दिले पत्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत, हि सत्यपरिस्थिती आहे. हद्दवाढ हि नैसर्गिक प्रक्रिया असून, हद्दवाढ होणे काळाची गरज आहे. याकरिता मंत्रालय स्तरावर बैठका, चर्चासत्र सुरु असून, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये शहराजवळील आठ गावे हद्दवाढीत समाविष्ट करून त्यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाला पाठविण्याचे आदेश मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी समन्वय साधून शहराशी एकरूप झालेल्या उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लेखी पत्राद्वारे दिल्या असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, मी राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे. ज्या पद्धतीने शहरातील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे त्याच पद्धतीचे नाते ग्रामीण भागातील नागरिकांशीही आहे. परंतु, या विषयात वैयक्तिक टीका- टिप्पणी करून ग्रामीण भागातील जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. परंतु, त्यांच्या नेत्यांनी राजकारणापलीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. त्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका आजही शहरवासियांना बसत आहे. दुसरीकडे आमदारकीच्या काळात असो वा आमदार नसताना मी जिल्ह्याच्या व शहराच्या विकासासाठी नेहमीच अग्रभागी भूमिका घेतली आहे. थेट पाईपलाईनसाठी विधान भवनात केलेल्या उपोषणामुळे थेट पाईपलाईन योजनेला मंजुरी मिळाली. कोल्हापूर सांगलीसाठी रु.३२०० कोटींचा पूरनियंत्रण प्रकल्प, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, १०० कोटींचे रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी रु.२० कोटी, अमृत योजना, मुलभूत सोयी सुविधा योजना यामाध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचपद्धतीने हद्दवाढीनंतरही समाविष्ट गांवाना विशेष निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
हद्दवाढीसाठी सन २०१६ मध्ये विधानभवनाच्या पायऱ्यावर मी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर शासनाने सकारात्मक भूमिका घेवून बैठक आयोजित केली होती परंतु, काही लोकप्रतिनिधीनी विरोध केल्याने हद्दवाढ रखडली. हद्दवाढ हि नैसर्गिक प्रक्रिया असून, राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर आदी शहरांच्या हद्दवाढीनंतर झालेला विकास पाहता कोल्हापूर मागे पडल्याचे दिसत आहे. शहराची हद्दवाढ झाली तर नक्कीच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होवून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणे शक्य आहे. खऱ्या अर्थाने शहराचा व जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे. यासह केंद्र व राज्य शासनाच्या लोकसंखेच्या आधारावरील सर्व विकासकामांना निधी मिळू शकणार आहे. हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेवूनच हद्दवाढ होईल, या मतावर आजही ठाम असून, जिल्ह्याच्या आणि पर्यायाने शहराच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीची भूमिका समजून घ्यावी व सर्वांनी सकारात्मक भूमिका ठेवावी.
कोल्हापूर शहराची वाढ झपाट्याने होत असून शहरानजीकच्या सर्व गावांमध्ये नागरी वस्ती विस्तारली आहे. आजरोजी या नागरी वस्तीतील लोक महानगरपालिकेच्या मुलभूत सोयी सुविधांचा नित्यनियमाने लाभ घेत आहेत. वस्तुतः महापालिका हद्दीच्या आसपास असणारी उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी हि गावे शहराशी एकरूप झालेली असून, कोल्हापूर महानगरपालिकेकडून या गावांना पाणीपुरवठा, केएमटी बससेवा या सेवा पुरवल्या जातात. उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लेखी पत्राद्वारे आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना दिल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबधित गावांना नोटीसा पाठवून त्यांचे ठराव घेतील. त्यानंतर सदर ठराव आणि हद्दवाढीचा प्रस्ताव ते राज्य शासनाकडे सादर करतील. यानंतर राज्य शासन संबधित आठ गावांच्या हद्दवाढीबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करेल आणि हद्दवाढीबाबत निर्णय घेईल, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

वाईट करणाऱ्याचे वाईटच होते व चांगले करणाऱ्याचे चांगलेच होते मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

0

शत्रूचेसुद्धा वाईट चिंतू नका, चांगले काम करीत राहा

वाईट करणाऱ्याचे वाईटच होते व चांगले करणाऱ्याचे चांगलेच होते मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मळगे बुद्रुक येथे विविध सत्कार व विकासकामांचे लोकार्पण

मळगे बुद्रुक/प्रतिनिधी : जो वाईट चिंततो आणि वाईट करतो त्याचे वाईटच होते. शत्रूचेसुद्धा वाईट चिंतू नका. चांगले काम करीत रहा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे वाईट चिंतणा-यांची परमेश्वराने किती दयनीय अवस्था करून ठेवली आहे हे तुम्ही पहातच आहात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.मळगे बुद्रुक ता. कागल येथे विविध सत्कार समारंभ आणि विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विधानसभेतील विजयाबद्दल व मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने झाला. तसेच; मळगे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती शांतादेवी पाटील व उपसरपंच श्री. एकनाथ वायदंडे यांचा मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक सगळ्या अर्थानेच आगळी-वेगळी होती. विरोधक कुठलीही गोष्ट करायची शिल्लक ठेवायची नाही, हे ठरवूनच कामाला लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून “मी पुन्हा निवडणूक लढविणार,” “मी हसन मुश्रीफांचा पराभव करणार,” “मी शाश्वत विकास करणार” असे सांगत ते मतदारांसमोर आले होते. त्यातूनच मला अटक करायची, माझ्या कुटुंबीयांना ई. डी. च्या फेऱ्यांमध्ये अडकवायचं, त्यांना त्रास द्यायचा, तरुणांची माथी भडकवायची असली कटकारस्थाने रचली. तसेच; कार्यकर्त्यांना उलट करण्यासाठीही पैसे दिले गेले आणि गप्प बसण्यासाठीही पैसे दिले. परंतु; मी मात्र कधीही त्यांचे वाईट चिंतले नाही. व्यक्तिगतरीत्या कधीही त्यांच्या वाटेला गेलो नाही.

माझा जिवापाड सांभाळ……..!

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकांच्या समस्या व अडीअडचणी या माझ्या समस्या आहेत. जनतेचे सुख- दुःख हे माझे सुख दुःख आहे, या भावनेनेच काम करीत आलो. म्हणूनच 35 -40 जनतेनेही माझा जिवापाड सांभाळ केला आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे यांचीही मनोगते झाली.
व्यासपीठावर बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, बिद्री कारखान्याचे संचालक पैलवान रवींद्र पाटील, रावसो खिल्लारी, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव अस्वले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष निलेश शिंदे, पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच बंडेराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर अस्वले, सतीश पाटील, वैशाली कांबळे, सुनीता परबकर, सविता कळमकर, श्रीकांत पाटील, एकनाथ पाटील, प्रताप पाटील, प्रा.टी.एम.पाटील, विश्वंभर हवालदार, हणमंतराव पाटील, रघुनाथ अस्वले, प्रमोद अस्वले, उत्तम पाटील, किशोर पाटील, भगवान अस्वले, पिराजी कांबळे, दत्तात्रय तिराळे, विलास परबकर, बाळासो पाटील, नंदकुमार पाटील, युवराज साळसकर, निवास परबकर, दिनेश कांबळे, उत्तम पाटील, निवृत्ती चौगले, आप्पासो डोणे, मनोज पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजी साळसकर, शिवाजी हवालदार, महादेव दाभोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.स्वागत प्रताप पाटील यांनी केले. प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून* उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.

0

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून*
उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.

 

तळसंदे/प्रतिनिधी : येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या “संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयात विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी जाहीर झाली आहे.उत्कर्ष अरुण आवळेकर यांनी “क्लाऊड कंप्युटिंग आणि वायरलेस सेन्सर नेटवर्कचा वापर करून आयओटी आणि एआय आधारित स्मार्ट शेती प्रणाली” या विषयावर डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.
योगेश विरुपाक्ष चिमटे यांनी “आंबा व भुईमूग पिकांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी एकत्रित मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.डॉ. उत्कर्ष आवळेकर व डॉ. योगेश चिमटे यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रो. (डॉ.) के. प्रथापन, कुलसचिव प्रो. (डॉ.) जे. ए. खोत, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली मनोहर भूपती, मुख्य वित्त अधिकारी सुजित सरनाईक, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांचे सहकार्य व पाठबळ लाभले.

आज २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजन

0

आज २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ असावेत, औषधं कोणती घ्यावीत, असे अनेक प्रश्न रुग्णांना भेडसावत असतात. या पार्श्वभूमीवर मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ञ डॉक्टरांकडून मिळावीत. या हेतूने ओळख मधुमेहाची हा मधुमेह तज्ञांसोबतचा परिसंवाद आयोजित केला आहे.शनिवार २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या संस्थेचे कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजेश देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीनं, आयोजित केलेल्या या परिसंवादाला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या प्रतिसंवादात मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय पाणीकर, मुंबईचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय नेगलूर, डॉ. लोतीका पुरोहित, डॉ. संहिता वालावलकर, डॉ. राजीव कोविल, डॉ. मयूरा काळे आणि डॉ. निखिल नाशीककर हे तज्ञ डॉक्टर मधुमेहाबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. विशेषबाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत मधुमेह, लठ्ठपणा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्या सुमारे १२० ते १५० रूग्णांसाठी बाजारात २ हजार ते ३ हजार रुपये आकारणी केली जाणारी फायब्रोस्कॅन तपासणी या ठिकाणी मोफत केली जाणार आहे. या मोफत तपासणीचा लाभ घेण्यासाठी ९६३७३०२४२४ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आणि शनिवारी २१ जूनला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेश देशमाने यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शर्विल गाडवे उपस्थित होते.

श्री.अमर पाटील आणि सौ.सविता पाटील यांनी यांनी वटपौर्णिमेदिवशी आलेल्या लग्नाचा वाढदिवस

0

श्री.अमर पाटील आणि सौ.सविता पाटील यांनी यांनी वटपौर्णिमेदिवशी आलेल्या लग्नाचा वाढदिवस

 

श्री.अमर पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. सविता यांच्या लग्नाचा वाढदिवस ११ जून रोजी म्हणजेच वटपौर्णिमा दिवशीच होता योगायोगाने आज वटपौर्णिमाही आहे. या दिवशी सर्वत्र वडाच्या झाडाचे पूजन करण्यात येते. सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सात जन्मी हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करतात. अमर पाटील यांच्या सहचारिणी सविता यांनीही वटसावित्रीची पूजा केली व त्याचबरोबर भुये गावच्या भैरोबा माळावर एक वडाचे झाड लावले, जेणेकरून त्याची पूजा आयुष्यभर करता येईल व हा दिवस कायम लक्षात राहील.
आजच्या दिवशी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आमचे बंधू बाजीराव पाटील दादा, पांडुरंग पाटील व विठ्ठल पाटील यांच्या हस्ते भुये गावच्या मैदानाभोवती पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. उन्हाळ्यात मैदानावर खेळणाऱ्या मुलांना सावली मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी आमचे चिरंजीव पार्थ पाटील, केदार पाटील, आमची भाची अमोली देशमुख, ओम पाटील, विश्वजीत पाटील, तसेच भुये गावातील ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुये (ता. करवीर) येथे भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम उत्साहात संपन्

0

भुये (ता. करवीर) येथे भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम उत्साहात संपन्

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : भुये व भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती यांच्या वतीने आज रविवारी वृक्ष लागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेला निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी आणि भैरोबा भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला.या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक वृक्षप्रेमीने एक देशी झाड घेऊन आले होते व ते झाड स्वतः लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. यावेळी वड, पिंपळ, लिंब, करंज, माळुंग, कवट, चिंच, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा, पिपरणी, नारळ, लिंबू, पारिजातक व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.
समितीचे समन्वयक अमर पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यावर शेकडो नागरिकांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहून उपक्रमात सहभाग घेतला.
या प्रसंगी भुये गावाचे माजी सरपंच अभिजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात (पिंटू) चौगुले,दिपक पाटील, अमर मिसाळ,शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, प्रमोद माने, संपत पाटील, सर्जेराव पाटील(S.Y), संजय पाटील, विकास पाटील, संतोष मानकापुरे, संभाजी पाटील (भुयेवाडीकर), तानाजी पाटील(आप्पा), देव पाटील, प्रदीप पाटील(कॉन्ट्रेक्ट्रर), आश्लेश खाडे, रामभाऊ पाटील, संपत पाटील, प्रणव पाटील, युवराज तळेकर, यशराज पाटील, रोहित पाटील, प्रथमेश पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, पार्थ पाटील, अथर्व पाटील, कान्होजी स्वामी, केदार पाटील, सुभाष साळोखे, दिनकर पाटील, दीपक शिंदे, शामराव पाटील (काका), विष्णुपंत पाटील, केवल पाटील, आणि हलगी सम्राट भार्गव आवळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संरक्षण व संगोपन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त करत उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले.आमच्या आवाहनाला साथ देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने वृक्षलागवाडीची ही चळवळ यशस्वीरीत्या संपन्न केल्याबद्दल भैरोबा वृक्ष संवर्धन समिती भुये भुयेवाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

सिद्धिविनायक च्या प्रसादसाठी पुन्हा ‘गोकुळ’ तुपाची पसंती सन २०२५-२६ वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार – चेअरमन नविद मुश्रीफ

0

‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती

सिद्धिविनायक च्या प्रसादसाठी पुन्हा ‘गोकुळ’ तुपाची पसंती सन २०२५-२६ वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार – चेअरमन नविद मुश्रीफ

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाला यंदा २०२५-२६ या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण २८० मेट्रिक टन गाय तुपाच्या पुरवठ्याची महत्त्वाची व प्रतिष्ठेची ऑर्डर पुन्हा मिळाली आहे. या संधीचे औचित्य साधून गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे मुंबई कडे जाणाऱ्या पहिल्या १० मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचे पूजन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळने आपल्या स्थापनेपासून दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या गुणवत्तेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गोकुळ गाय तुपाचा दर्जा, सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पसंती दिली आहे. हे फक्त गोकुळचं नव्हे, तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेलं प्रमाणपत्र असल्याचे मनोगत व्यक्त केले.
सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून प्रतिवर्षी प्रसादासाठी हजारो लिटर शुद्ध तुपाची मागणी असते. सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य, महापूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे तूप पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असावे या निकषावर गोकुळचे गाय तूप सलग दुसऱ्या वर्षी पसंत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सन २०२४-२५ मध्ये २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा गोकुळने यशस्वीरीत्या केला होता. त्या तुपाच्या गुणवत्तेची, चव, सुवास आणि सात्विकता यांची दखल मंदिर प्रशासनाने घेतली आणि त्यामुळेच यावर्षीच्या टेंडरमध्ये ही गोकुळच्या गायीच्या तुपास प्रथम प्राधान्य मिळाले. या वर्षी मिळालेल्या नवीन २८० मेट्रिक टन ऑर्डरनुसार गोकुळकडून दरमहा सरासरी २४ मेट्रिक टन गायीचे शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिरास पाठविण्यात येणार आहे. यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

टी २० सामन्यांसाठी मुंबई लीगचे सहप्रायोजक बनले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

0

टी २० सामन्यांसाठी मुंबई लीगचे सहप्रायोजक बनले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने, संजय घोडावत समूहाच्या अंतर्गत कार्यरत, टी२० मुंबई लीग २०२५ सोबत सहप्रायोजक म्हणून करार केला . हा करार म्हणजे शिक्षण आणि क्रीडा यांच्या समन्वयातून भविष्यासाठी सक्षम व्यक्ती घडविणे हा उद्देश आहे.
मूल्ये ही वर्गखोल्यांप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानावरही महत्त्वाची ठरतात. SGIS आणि टी २० मुंबई लीग यांच्यातील संबंध हे युवा मनांना शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात प्रेरणा देण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी बोलताना संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, “आम्हाला टी २० सामन्यांसाठी मुंबई लीगसोबत सहयोग करण्यात अभिमान वाटतो, क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये प्रतिभा, महत्त्वाकांक्षा आणि सांघिकता या मूल्यांचा विकास होतो. हीच मूल्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. भारतातील कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ओळखले जाते. देशभरातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रतिष्ठित असणाऱ्या या टी २० मुंबई लीगसोबतच्या या भागीदारीमुळे, क्रीडा क्षेत्रामधील अनेक चांगल्या क्रिकेट खेळाडूंना वाव मिळणार आहे. यातील एखादा भविष्यातील भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व करेल. आमची ही भागीदारी फक्त एक करार नाही, तर पुढील पिढीला मैदानावर आणि मैदानाबाहेरही मोठे स्वप्न पाहण्यासाठी, शिस्तबद्ध राहण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी दिलेली एक खूप मोठी संधी आहे.
टी २० मुंबई लीगचा हंगाम ३, हा ४ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत डी. वाय. पाटील स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल, ज्यात देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचकारक सामने होतील. या लीगमध्ये आठ दमदार संघ आहेत. त्यांचे २३ सामने असतील, जे नऊ दिवसांत खेळवले जातील. उपांत्य फेरी व अंतिम सामना अनुक्रमे १० आणि १२ जून रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

0

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

 

मुंबई/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या करारांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आयात निर्यात वरती आधारित विविध पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका आकृती बागवे, प्रिया पानसरे, संतोष कोत्रे व तृप्ती चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जो धोरणकर्ते, जागतिक व्यावसायिक आणि विकास संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य करते. वर्ल्ड ट्रेड इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना जोडण्याचे कार्य करते तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन आणि औद्योगिक भविष्यासाठी व्यावहारिक कौशल्ये प्रदान करते.डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले “जागतिक बाजारपेठेच्या गरजांशी शैक्षणिक क्षेत्राची पूर्तता करण्याच्या दिशेने आम्ही महत्वाचे पाऊल टाकले आहे. व्यापार शिक्षण, उद्योजकता आणि औद्योगिक करिअरमध्ये उद्योग-संबंधित कार्यक्रम सुरू करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईने आयोजित केलेल्या आगामी जागतिक आर्थिक शिखर परिषदेत शाश्वत शेतीमध्ये कृषी-तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे विषय एकत्रित करण्यावर यावेळी चर्चा झाली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व डॉ. जे. ए. खोत यांचे सहकार्य लाभले.

डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

0

डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची
न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलचे लॉरिएट प्रा. अजयन् विनू यांच्या पुढाकारातून हा आंतरराष्ट्रीय संशोधन सहयोग (कोलॅबरेशन) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रचार व संशोधनाला चालना मिळणार आहे.
डॉ. तिवारी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलमध्ये ग्लोबल इनोव्हेटिव्ह सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड नॅनोमटेरियल्स (GICAN) मध्ये कार्यरत राहणार आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अजयन् विनू हे या केंद्राचे नेतृत्व करत आहेत.
या कोलॅबरेशनमुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधन कार्याला तसेच डॉ. तिवारी यांच्या नॅनो बायोटेक्नोलॉजी, माफक खर्चामधील निदान व ट्रान्सलेशनल हेल्थकेअर या क्षेत्रातील योगदानाला अधिक चालना मिळणार आहे. या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे, विभाग प्रमुख डॉ. मेघनाद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.