महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य सरकारने महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसानभरपाईची मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत अपेक्षित असताना महायुती सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला ३.४७ लाखांची मदत मिळेपर्यंत मनरेगामध्ये मजुरी करावी लागणार. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. महापुराने जी शेती उध्वस्त झाली त्यावरील पीककर्ज माफ होणार नाहीच; उलट या कर्जाचे पुनर्गठन होऊन शेवटी तो भार शेतकऱ्यावरच येणार आहे. त्यामुळे घोषणा झाली खरी; पण शासनाच्या जीआरमधील अटी- शर्तीं लागू होऊन शेवटी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही असे दिसते. त्यामुळे महायुती सरकारने ही मदत जाहीर करुन शब्दांमधून दिलासा आणि हिशेबात फसवणूक केली असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.