कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करा : आमदार जयश्री जाधव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करावी अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अधिवेशन काळात आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महापालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत कोल्हापूर महापालिकेची हद्द ६६.८२ चौरस किलोमीटर आहे. एवढ्या कमी जागेत तब्बल सात लाख लोक राहातात. शहराची उभी वाढ होत असताना शहर आडवे वाढण्याची गरज आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या उदासीन धोरणामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केले आहे. परंतु शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
कोल्हापूर महापालिका प्रशासनाने २०१३ पासून २०२१ पर्यंत ४ वेळा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले आहेत. २०१४ मध्ये १७ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर राज्य शासनाकडून कोणतिही कार्यवाही केलेली नाही किंवा कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने शासनाने हद्दवाढीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये आपल्या सूचनेनुसार १८ गावे व दोन एमआयडीसींसह नवीन प्रस्ताव कोल्हापूर महापालिका प्रशासनाने आपल्याकडे सादर केला आहे. मात्र या प्रस्तावावर ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूर शहराचा विकास खुंटला आहे. शहराची वाढ झाली नसल्याने नवे उद्योग येत नाहीत. आहे त्या उद्योजकांनी विस्तारीकरण थांबवले. काहींनी येथून गाशा गुंडाळला. हद्दवाढीचा परिणाम उद्योगांवरही झाला. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन शहराची हद्दवाढ करावी.