नियोजन, सातत्य आणि सराव हीच यशाची त्रिसूत्री यूपीएससी परीक्षेतील यशवंतांचा कानमंत्र; विद्या प्रबोधिनी तर्फे सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर नियोजन, सातत्य आणि सराव हेच अत्यावश्यक आहेत असा कानमंत्र यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी दिला. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित यूपीएससी यशवंत सत्कार सोहळा आज रोजी व्ही. टी. पाटील सभागृह येथे पार पडला.यावेळी यशस्वी उमेदवार श्री वसंत दाभोळकर आणि श्री सिद्धार्थ भांगे यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यूपीएससी तयारीच्या काळातील आपले अनुभव व्यक्त करताना यशवंतांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्याशी दिलखुलास संवादही साधला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे होते.
श्री महेंद्र पंडित यांनी युपीएससी ची परीक्षा ही अवघड वाटत असली तरी अशक्य नक्कीच नसल्याचे सांगितले. एक निश्चित आराखडा आखून तयारी केल्यास परीक्षेतील यश सहज साध्य होते असे ते म्हणाले.अभियांत्रिकीची पदवी घेतलेले व तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवणारे वसंत दाभोळकर यांनी परीक्षेच्या तयारीतील सातत्य हा कळीचा मुद्दा असल्याचे मत मांडले. यूपीएससीची तयारी करत असताना प्लॅन बी म्हणून आपण जर इतर करिअर विषयी देखील जागरूक असू तर प्रत्यक्ष यूपीएससीची तयारी करताना फार दडपण येत नाही अस ते म्हणाले. पूर्ण वेळ तयारी करण्यासाठीचा काळ निश्चित करावा व त्या अवधी मध्ये स्वतःला झोकून देवून तयारी करावी असे मत त्यांनी मांडले.
कला शाखेचे पदवीधर असणारे व अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणारे सिद्धार्थ भांगे यांनी तयारीच्या काळात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या ध्येयाप्रती निष्ठा व अभ्यासात जिद्द बाळगणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.आपल्याला आयएएस का व्हायचे आहे याचे कारण ठाऊक असणे व स्व-प्रेरणेवर काम करणे हाही यश मिळवण्याचा मूलमंत्र असल्याचे दोन्ही यशवंतांनी संवाद सत्रात नमूद केले.
ना. श्री चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे यशवंतांचे अभिनंदन केले. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्यांमधीलच अधिकाधिक मुलांनी प्रशासनात येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. विद्या प्रबोधिनी तर्फे यूपीएससीच्या तयारीसाठी कोल्हापूर मधील विद्यार्थ्यांना जे हवे ते उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्या प्रबोधिनीचे संचालक श्री. राजकुमार पाटील यांनी यूपीएससीच्या मुलांसाठी विद्या प्रबोधिनी पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर शिष्यवृत्ती देत असल्याचे सांगितले. यूपीएससी परीक्षेतील निकाल कोल्हापुरातूनही यावेत यासाठी विद्या प्रबोधिनी करत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती श्री. राजकुमार पाटील यांनी दिली. परीक्षा अवघड आहे समजल्यास ती अवघडच वाटत राहते. मात्र परीक्षा शक्य आहे असे मानल्यास ती सोपी जाते असे ते म्हणाले.कार्यक्रमावेळी श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी श्री बाळासाहेब यादव यांची विशेष उपस्थिती होती.
सारा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे नितीन कामत, वृंदा सलगर, अमित लवटे, शिवानी निंबाळकर व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.