कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त आहे. प्रजासत्ताक दिनाचे. प्रा. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून गूळ उत्पादक शेतकरी राजेंद्र करंबे यांनी त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या उसाच्या रसापासून हा गूळ तयार करण्यात आला आहे. त्याच गुळाच्या पाकातून जिलेबी तयार केली आहे. मिरजकर तिकटी येथे सुरु करण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक विशाल शिराळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कृषीअभ्यास डी.बी.चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा पार्टे, सीपीआरचे डॉ. शिरीष मुरगुंडे, शिक्षक नेते पी.के.पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, जयाकुमार शिंदे, एसएससी बोर्डाचे अधिकारी रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकर नेहमीच वेगळे कांही शोधत असतात, त्यातून साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या जिलेबीबरोबर कोल्हापुरीतील गुळापासुन तयार केलेल्या जिलेबीचा स्टॉल सर्वानाच आवडेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिहं जाधव यांच्या प्ररेणेने गुळाच्या जिलेबीचा स्टॉल सुरु केला आहे. या जिलेबीसाठी संपूर्णपणे सेंद्रीय गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे कोल्हापूरशहर वासियांच्याबरोबर भाविक, पर्यंटक यांना ही जिलेबी आवडेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

