जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावर २ ते ६ एप्रिल दरम्यान अन्नछत्र आयोजित
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा. चैत्रामध्ये होणारी ही यात्रा प्रमुख मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख यात्रेकरू मोठया उत्साहाने सहभागी होतात.यावर्षी ही यात्रा येत्या ५ एप्रिल रोजी होत आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सहज सेवा ट्रस्टतर्फे अन्नछत्र दिनांक २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस रात्र सुरू राहणार आहे.अशी माहिती रोहित गायकवाड,चेतन परमार,चिंतन शहा,
मनीष पटेल आदींनी पत्रकार परिषदेत दिली.
या यात्रेसाठी आपापल्या भागातून सासनकाठ्या घेऊन यायची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे आजही अनेक मानाच्या काठ्या घेऊन शेकडो मैल पायी चालत चांगभलचा गजर करीत भक्तगन जोतिबा डोंगरावर येतात. आजच्या आधुनिक काळातही आपल्या गावातून, आपल्या परिवारासह बैलगाडीतून, डोंगरावर येणारे भावीकही आहेत.अशा अनेक पंरपरा या यात्रेमध्ये अजूनही सांभाळल्या जातात. लाखोंच्या संखेने यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालविण्यात येते.
मागील वर्षी झालेली गर्दी लक्षात घेवुन यावर्षी दोन लाखाच्या वर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात्रेकरिता डोंगरावर प्रमुख दोन मार्गाने काणत्या ना कोणत्या वहाणाने यात्रेकरू येतात. त्याचबरोबर कुशिरे ते गायमुखामागे जोतिबा डोंगरावर चालत येण्याचा हा पारंपारिक मार्ग आजही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मार्गावरून बहुसंख्य यात्रेकरू व सासनकाठ्या डोंगरावर येतात. वाहनांनी येणारे यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखा वर येतात. यांच्या वाहनांसाठी गायमुख परिसरामध्ये वाहनतळ तयार करण्यात आला आहे. येथे लाईटची व्यवस्था ही करण्यात आली आहे.
आपआपल्या गावातून येणारि यात्रकरू कधी ही रात्री अपरात्री डोंगरावर पोहोचत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या हेतूने त्यांच्या सोयीकरिता सहज सेवाचे अन्नछत्र २४ तास सुरू असते. यात्रा काळात चार दिसव यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, वन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग, विद्युत विभाग, त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहज सेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येते. ते पॅकेटद्वारे या विभागातील सर्वाना पोहोचवण्याचे काम पोलीस दल व पश्चिम महराष्ट्र देवस्थान समिती करते.
अशी आहे अन्नछत्राची व्यवस्था
अन्नछत्रा मध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी १०८ बाय १३८ म्हणजेच १५ हजार चौरस फुटाचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्या करिता वेगळा मंडप उभारण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर व अन्नाची व्यवस्था
येणाऱ्या भाविकांना रक्तदानाचे महत्त्व कळावे या उद्देशाने कोल्हापुरातील सरकारी दवाखाना व महात्मा गांधी हॉस्पिटल पारगाव यांच्या सहकार्याने गायमुख परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. गायमुख परिसरामध्ये योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता शासनाच्या आरोग्य विभागामार्फत २४ तास वैद्यकीय सेवा व एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.अन्नछत्र परिसरामध्ये निसर्गाचे रक्षण व्हावे अन्नाची नासाडी होऊ नये त्याचबरोबर येणाऱ्या यात्रेकरूंना व्यवस्थित जेवता यावे याकरिता स्टेनलेस स्टीलची ताटे चहा व मठ्यासाठी स्टील ग्लास ठेवण्यात येणारे आहेत.
लागणारे साहित्य
प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढतच आहे. वाढणाऱ्या भक्तांच्या संखेच्या अंदाजाप्रमाणे अन्नछत्रासाठी साहित्यही मोठ्या प्रमाणात लागत आहे. कमीत कमी दोन लाख भावीक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. जेवणासाठी लागणारे साहित्य पंधरा हजार किलो बासमती तांदूळ,
तीन हजार किलो तूरडाळ,सहा हजार किलो रवा,दहा हजार किलो साखर, ४५० डबे रिफाइंड तेल,सात हजार लिटर दूध,३०० किलो चहा पावडर, ३०० किलो मूग,३०० किलो काळा घेवडा,३००० किलो बटाटा, ४००० किलो कांदा, २०० किलो लसूण, ट्रक भरून भाजी पाला, चार टन लाकूड २०० गैस सिलेंडर चटणी व इतर मसाले इत्यादी सामान लागणार आहे व ते नीट व तयार करून ठेवण्यात आले आहे.साहित्या बरोबरच जेवण करण्यासाठी २० मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० बायका, ५० वाढपी, ताट वाटी भांडी धुण्यासाठी ७० बायका, ताट वाटी स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामसाठी ५० मजूर, त्याचबरोबर सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त, स्नेही, हितचिंतक असे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत.अन्नछत्राची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यात्रेकरूनी या अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सहज सेवा ट्रस्ट तर्फे या करण्यात आले आहे.ज्या दानशुर व्यक्ती अथवा संस्थाना सदर उपक्रमास मदत करायची आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्ट ३९८ ई वार्ड आशिष चेंबर्स बसंत बहार सिनेमा समोर स्टेट बैंक कोषागर शाखा शाहुपुरी कोल्हापूर. अधिक माहितीसाठी मो.नं. ९८९०९४४३४३ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या सर्व उपक्रमासाठी संमती मिर्जे व प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अन्य टीम कार्यरत आहे.