श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध – संभाजीराजे छत्रपती
बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. बिहारची राजधानी पटना येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उत्तर भारतातून संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर एल चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ७५ वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले जावे, अशी समाजबांधवांची मागणी यावेळी संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात उध्दृत केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून परतत असताना पटना येथे आले होते, अशी येथील बांधवांची श्रद्धा आहे. आज साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपतींचे वंशज पटना येथे आले म्हणून त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देखील आपले कार्यक्षेत्र सोडूनही देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांना “राजर्षी” ही उपाधी उत्तरप्रदेशातील कानपूर येथील कुर्मी समाजाने दिली होती.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या देशभरातील अनेक संस्था संघटनांकडून मला वेळोवेळी बोलावले जात असते. यापूर्वी देखील मी उत्तर प्रदेश मधील लखनऊ, कानपूर तसेच मालदा – पश्चिम बंगाल, हैद्राबाद अशा ठिकाणच्या सामाजिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो आहे. श्री शिव शाहूंचे विचार देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे.