कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी – पै . विष्णु जोशीलकर

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : फक्त खेळाडूच नव्हे तर जीवन संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांना ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे चरित्र नेहमी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत वस्ताद विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केले . ध्रुवतारा फाउंडेशनच्यावतीने
प्रा. संजय दुधाणे लिखित
ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तक कुस्तीगीरांना भेट देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.जुन्या मोतीबाग तालमीत महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर व लेखक प्रा. संजय दुधाणे यांच्या हस्ते कुस्तीगीरांना पुस्तक देण्यात आले. याप्रसंगी
राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक पवार, कुस्ती संघटक बाबा महाडिक, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी ज्येष्ठ वस्ताद बाळ गायकवाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली .
कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा देत खाशाबांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह १६६ पानांनी पुस्तक सजले असून दिवगंत जेष्ठ लेखक य.दि. फडके यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. प्रा. संजय दुधाणे यांनी सखोल संशोधन करीत हे जीवन चरित्र शब्दचित्रित केले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत तालमींना ऑलिंपिकवीर खाशाबा पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरातील राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, धैयशील पुंगावकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे यांनीही खेळाडूंसाठी पुस्तक भेट उपक्रम राबविणार आहेत.
खाशाबांनी जिंकलेल्या पदकाच्या कामगिरीला संजय दुधाणे यांनी उजाळा दिला. पदकाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने हे पुस्तक नव्या रूपात वाचकांच्या हाती देताना आनंद होत असल्याचे लेखक दुधाणे यांनी सांगितले आहे. खाशाबा हे आम्हा कुस्तीगीरांचे दैवत असून लेखक संजय दुधाणे यांच्यामुळे खाशाबांची कामगिरी जगापुढे सर्वप्रथम आली याबद्दल त्यांचे कौतुक तेवढे कमी आहे असे महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर यांनी सांगितले.
खाशाबासारखे ऑलिम्पिकवीर कोल्हापुरातून घडविण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे शिवाजी साळुंखे यांनी नमूद केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी केले तर आभार सागर ठाणेकर यांनी मानले. मोतीबाग तालमीतील पैलवान तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *