गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज बुधवार दि. सहा मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.याबाबत अधिक माहिती अशी, पुंगाव ता. राधानगरी येथील श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल आणि आज अशी दोन दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची याचिका मंजूर केली. या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच; गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदललेला होता, त्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच; या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे व हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाला दिले आहेत.
काल व आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲड. मुकुल रोहतगी यांनी श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. श्री. तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने ॲड. श्री. धर्माधिकारी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *