कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवे दिशा—पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून उद्योग, पर्यटन आणि स्मारक विकासाला गती देण्याचे आश्वासन
कोल्हापूर /प्रतिनिधी जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारण्याच्या दिशेनेही शासनाकडून कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी पालकमंत्री आबिटकर यांनी माजी आमदार व शिवसेना उपनेते जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव उपस्थित होते. या भेटीत शहराच्या विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली.
शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांच्या नेतृत्वात सादर झालेले महत्त्वाचे प्रस्ताव
जयश्री जाधव यांनी आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते विकास, उद्यान, क्रीडा संकुल, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटन आराखडे व महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास या बाबत शासन दरबारी अनेक प्रस्ताव सादर केले होते, परंतु सध्या हे प्रस्ताव प्रलंबित आहेत.या प्रस्तावांना तातडीने गती मिळावी, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी व ह्या प्रकल्पांचे प्रत्यक्षात रूपांतर व्हावे,” अशी ठाम मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आबिटकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
शाहू स्मारकासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे योगदान
जयश्री जाधव यांनी यावेळी नमूद केले की, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ‘शाहू मिल पर्यटन विकास आराखडा’ स्वखर्चाने तयार करून शासनाकडे सादर केला होता. हा आराखडा कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि पर्यटन विकासासाठी मोलाचा ठरणार आहे. या आराखड्याला मान्यता मिळून शाहू मिलच्या जागेवर भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्योग क्षेत्रासाठी लवकरच निर्णायक बैठक
युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी जिल्ह्यातील उद्योजक व लघुउद्योगांवरील अडथळे, परवानग्यांची प्रक्रियात होणाऱ्या विलंबासंदर्भात स्पष्टपणे मांडणी केली. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, “उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून लवकरच औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली जाईल.”
कोल्हापूर महापालिका व शहर विकासाच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा
यावेळी पुढील कोल्हापूर महापालिका निवडणूक, महापालिकेची हद्दवाढ, रंकाळा तलावाचे सुशोभीकरण, गार्डन्सचा विकास, क्रीडा व फुटबॉल खेळाडूंसाठी सुविधा, शहर पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प, तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास योजनेला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीतून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवे गतीमान स्वरूप मिळेल. शाहू महाराजांचा इतिहास, कोल्हापूरचा सांस्कृतिक ठसा आणि आधुनिकतेचा समतोल साधत कोल्हापूरला भविष्यात एक मॉडेल शहर म्हणून उभारण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरेल असा विश्वास माजी आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.