स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी माजी पालकमंत्री यांच्याकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल : रणजीत जाधव, शिवसेना शहरप्रमुख
कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. एकीकडे देश विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना विकासाला चालना देणारे प्रकल्प होणे काळाची गरज आहे. दळणवळण, पर्यटन वाढीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांनाच होणार आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल केली जात आहे. शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करण्याचे काम माजी पालकमंत्री यांच्याकडून केले जात असल्याची टीका, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, यात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशी शाश्वती जिल्ह्याचे शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. विरोधक सत्तेत असताना त्यांनी फक्त तोंडाची हवा वायफळ घालविण्याचे कामे केले. जनहिताचे काम करणे माजी पालकमंत्री महोदयांना कधी जमलेच नाही. आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी जिल्ह्यात कोणताच प्रकल्प होवू द्यायचा नाही जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाचा फायदा सत्ताधारी महायुतीस होईल हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचे काम माजी पालकमंत्री यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतही अशाच अफवा पसरविण्याचे काम माजी पालकमंत्री यांनी केले आहे. शहरातील १०० कोटींचे रस्त्यांच्या वर्कऑर्डर झाल्या नसल्याच्या वल्गना त्यांनी केल्या होत्या पण प्रत्यक्षात वर्कऑर्डर झाल्या होत्या. महापालिकेचे ५०६ रोजंदारी कर्मचारी कायम झाले नसल्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी कर्मचारी कायम केल्याचे आदेशच दिल्याने माजी पालकमंत्री यांना तोंडघशी पडावे लागले आहे. सद्या माजी पालकमंत्री यांच्याकडे जनतेत गैरसमज पसरविण्याशिवाय कोणतेही काम शिल्लक नाही. तोडपानी स्पेशालीस्ट जिल्हाप्रमुखांचे आयुष्य कर्तव्यशून्य आहे. आजपर्यंत आंदोलनांच्या नावाखाली तोडपानी करण्याची त्यांची स्टाईल कोल्हापूरच्या जनतेला सर्वश्रुत आहे. जिल्हाप्रमुखांची आंदोलनातील तोडपानी करून किंवा बळकावलेली जमीन कदाचित या महामार्गात येत असल्याने ते कासावीस झाले असावेत. परंतु, त्यांचीही जमीन बाधित होवून नुकसान होत असेल तर त्याचा योग्य मोबदला सरकार देण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्ये बंद करावीत अन्यथा येणाऱ्या काळात अशा वक्तव्यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलने उत्तर देवू, असा इशारा त्यांनी दिला.
समृद्धी महामार्गाला देखील सुरवातीला विरोध झाला परंतु शासनाने बाधितांना अधिक पटीने मोबदला दिला. आज समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे. परंतु, कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. याचा सारासार विचार सर्वांनी करावा. महायुती सरकार कोणावरही अन्याय करणार नाही याची खात्री बाळगावी. तसेच दिशाभूल करणाऱ्या माजी पालकमंत्री व तोडपानी स्पेशालीस्ट जिल्हाप्रमुखा पासून शेतकरी बांधवांनी सावध रहावे, असे आवाहनही शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी केले.