कोल्हापुरात उद्या रविवारी पाच गुरु पादुकांचा दर्शन महासोहळा
श्री दत्त याग यज्ञ, पादुका दर्शन, सामुदायिक नामस्मरण, महाआरती, भक्तीगीते, रक्तदान शिबीर आदींचा समावेश
कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्यावतीने आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दहा वर्षे कोल्हापुरातून प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्त जयंतीला कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पर्यत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने दत्त संप्रदायातील पाच महान संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव आणि नामस्मरण महासोहळा कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज, धनकवडीचे श्री शंकरबाबा महाराज आणि कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या पाच गुरुंच्या पादुकांचा समावेश आहे.
रविवारी दुपारी ३.०० वाजता या पादुका कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या मठात येतील. तिथून वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदुगांच्या गजरात भव्य दिंडीने पादुका पंचगंगा नदी काठावर भाविकांना दर्शनासाठी मार्गस्थ होतील. पादुका दर्शनासाठी नदी तीरावर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी ३.०० ते रात्री ९.०० पर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
परमपूज्य श्री गणावधूत महाराज यांच्या दिव्य सानिध्यात या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, श्री क्षेत्र पैजारवाडीचे ओम चैतन्य गुरु माऊली, स्वामी भक्त मिलिंद धोंड, उद्योजक नितीन वाडीकर, कोल्हापूर महानगर पालिकेच्या माजी परिवहन सभापती सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे, पदयात्रेचे मार्गदर्शक, प्रवचनकार प्रा. कुलदीप साळोखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
गुरु सोहळ्यात दानाला जास्त महत्त्व आहे असे अनेक ग्रंथांतून सांगितले आहे. त्या अनुषंगाने
आयोजकांनी दुपारी ३ ते रात्री ७ या वेळेत कार्यक्रम स्थळी भाविकांना गुरु पादुकांच्या साक्षीने रक्तदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. सीपीआर रक्त पेढीच्यावतीने गरजू आणि गरीब लोकांना या सेवेचा लाभ होणार आहे. तसेच दुपारी २.३०, वाजता श्री दत्त याग यज्ञास प्रारंभ होऊन दु. ४.०० वाजता श्रीराम स्तोत्र पठण, सायंकाळी ४.३० वाजता कोल्हापूरातील प्रथितयश कलाकार, सुप्रसिद्ध गायक रणजीत बुगले यांचा
“भक्तीगंध” हा अभंग-भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ५.३० वाजता पंचगंगा नदीची आणि सर्व संतांची महाआरती होईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा “सामुदायिक नामस्मरण सोहळा” संपन्न होईल. सायं. ७.०० वाजता गुरु पादुकांना शंखध्वनीने मानवंदना देऊन भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील सहा भक्तांना “स्वामी रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. रात्री सव्वा सात वाजता महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल.
या संपूर्ण सोहळ्याचे निवेदन स्वामी भक्त, प्रवचनकार श्री ओंकार नवलिहाळकर करणार आहेत.
एकाच वेळी, एकाच ठिकाणी पाच गुरुंच्या पादुका येत असल्याने कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, या अनुषंगाने चोख व्यवस्था आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे. पादुकांसाठी दर्शन रांग, भव्य स्टेज उभारण्यात आले आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेऊन नामस्मरणात दंग होऊन जावे, असे आवाहन कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, अध्यक्ष अमोल कोरे, स्वामी भक्त संजय हसबे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला उपरोक्त आयोजकांसोबत प्रा. कुलदीप साळुंखे, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरचे विश्वस्त फत्तेसिंह राजमाने, रमेश चावरे,
सुभाष उमाणे-पाटील, नारायण यादव, मनोज माने, वेणूताई सुतार, कुलदीप जाधव, अजय हांडे, केदार रसाळ, रमेश माने, चेतन घोरपडे आणि सर्व स्वामी सेवक उपस्थित होते.