केआयटी मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु
भित्तीपत्रक व पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
कोल्हापूर/प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून भारतातील सर्व स्वायत्त संस्थांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने या वर्षीपासून ही योजना प्रत्यक्षात आणण्याची कृती सुरू केलेली आहे. यातीलच एक भाग म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी भित्तीपत्रक व पथनाट्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.
दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल समिर मोहिते व त्यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल स्वागता मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. ‘लीड इंडिया’ या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणातील मुख्य मुद्दे, त्याचा बदलत्या शिक्षणावर होणारा परिणाम, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलते शिक्षण व मुख्यत्वे नवीन धोरणाचा मुलांना व शैक्षणिक क्षेत्राला होणारा फायदा या विषयाला घेऊन हे भित्तीपत्रक तयार करण्यात आले आहे. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तवातील शैक्षणिक स्थिती व नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी नंतर भविष्यातील शैक्षणिक स्थिती अशा बाबतची जाणीव करून देण्याचा प्रयत्न ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या’ माध्यमातून करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.साजिद हुदली, सचिव श्री.दीपक चौगुले अन्य सर्व विश्वस्त कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जीन्नी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, रजिस्टर डॉ.एम.एम.मुजुमदार उपस्थित होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचे समन्वयक व डीन, क्वालिटी अश्युरन्स डॉ.प्रशांत पोवार व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अमित वैद्य यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य यासाठी लाभले.