यूनिसेफचे राज्य सल्लागार तानाजी पाटील यांना पीएचडी पदवी
कोल्हापूर/प्रतिनिधी : यूनिसेफ महाराष्ट्राचे राज्य सल्लागार तानाजी दादू पाटील ( मांगोली ता.राधानगरी)यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने डॉक्टरेट (पीएचडी) पदवी जाहीर केली.
श्री.पाटील हे युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेत समर्थन आणि संवाद विभागात राज्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.श्री. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा मुडे- पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “ इम्पॅक्ट ऑफ सोशल अँड बिहेव्हरल चेंज कम्युनिकेशन ऑन रुरल सॅनिटेशन प्रोग्राम विथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट.” या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता.ते गेल्या १८ वर्षापासून या संस्थेत स्वच्छता आणि लोकसहभाग या विषयावर काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात हि काम केलेले आहे.
श्री पाटील यांनी आपल्या संशोधनामध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सखोल अभ्यास केला आहे. यामध्ये त्यांनी लोकांच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या संवाद उपक्रमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे हे मॉडेल मांडले आहे.तसेच गावस्तरावर कार्यरत विविध व्यक्ति सरपंच, सदस्य, ग्रामसेवक ,शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदिचा अभियान राबविण्यावर कसा प्रभाव पडतो, यावरही संशोधन केले आहे. श्री पाटील यांच्या संशोधनाचा विविध सरकारी उपक्रम गावागावात राबविण्याकरीता प्रभावी संवाद आराखडा बनवण्यासाठी होणार आहे. ज्यामुळे लोकांच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे.
त्यांच्या या यशात त्यांना डॉ. निशा पवार, यूनिसेफ महाराष्ट्राच्या संवाद विशेषज्ञ डॉ. स्वाती मोहपात्रा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.