चिल्लर पार्टीचा अकरावा वर्धापन दिन वाड्यावस्त्यांतील साडेतीनशे मुलांसोबत साजरा
बालचित्रपटानंतर टाउन हॉल बाग, शाहू महाराज समाधीस्थळ, गंगाराम कांबळे स्मारकाला भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील राधानगरी आणि दाजीपूर परिसरातील वाड्यांमधील ९ शाळांमधील साडेतीनशे शाळकरी विद्यार्थ्यांनी रविवारी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ पाहिले. यानंतर या विद्यार्थ्यांनी गंगाराम कांबळे स्मारकाला भेट दिली आणि त्यानंतर टाउन हॉल बागेतील दुर्मिळ झाडांची माहिती घेतली. तत्पूर्वी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा अकरावा वर्धापन दिन शाहू स्मारक भवनात पार पडला. या मुलांनी ‘गॉड मस्ट बी क्रेझी’ या सिनेमाचा आनंद घेतला.शाहू स्मारक भवन येथे मुलांच्या हस्ते केक कापून अकरावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉ. भगवान हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले, प्रा. अरुण शिंदे, विजय रानमाळे, दीपक जगदाळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे राधानगरीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पाटील, करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते राधानगरी, दाजीपूरच्या या वाड्यांवस्तीतील सुमारे नउ शाळांमध्ये ग्रंथालय सुरु करण्यासाठी चिल्लर पार्टीमार्फत आणि समाजभान समूहामार्फत पुस्तकांचा संच आणि वह्या देण्यात आल्या.मीना विजय गाटे आणि उमेश बिरंबोळे यांच्या मदतीबद्दल त्यांचे विशेष आघार मानण्यात आले. चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापनदिन आमशीसारख्या ग्रामीण भागात व्हावा अशी अपेक्षा यावेळी विश्वास सुतार यांनी व्यक्त केली. अशोक पाटील म्हणाले, माझा पहिला सेवानिवृत्तीचा सत्कार आज झाला. यापुढे कार्यकर्ता म्हणून या आनंदयात्रेत मी सहभागी होईन. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्र शिंदे यांनी चिल्लर पार्टीची माहिती दिली.
या कार्यक्रमात बनाचीवाडी, पाटपन्हाळा, बुजवडे, हसणे, हसणे तांब्याचीवाडी, मांडरेवाडी, दाजीपूर, वलवण, डिगस तसेच कोल्हापूरातील अवनी संस्थेचे आणि सुधाकर जोशी झोपडपट्टीतील विद्यार्थी तसेच त्यांचे शिक्षक उपस्थित होते. सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ या चिल्लर पार्टीचे पुस्तक भेट देण्यात आले. या विद्यार्थ्यांना टाऊन हॉल बागेतील संग्रहालय व दुर्मिळ झाडांबद्धलची माहिती ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन बबन बामणे, ओंकार कांबळे, नसीम यादव, धनश्याम शिंदे, अर्शद महालकरी, यशोवर्धन आडनाईक, अभिजित कांबळे, अनिल काजवे, विजय शिंदे, सचिन पाटील, सुधाकर सावंत, महेश नेर्लीकर, मिलिंद कोपार्डेकर, अभय बकरे, मिलिंद नाईक, अनुजा बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, सलीम महालकरी यांनी केले.