देश विकायला निघालेल्या चोरांच्या विरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहणार
भाजपला हकलल्याशिवाय आम्ही गप्प बसवणार नाही – आमदार पी. एन पाटील यांचा इशारा……
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत देश विकायला निघालेल्या चोरांच्या विरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहणार असून, भाजपला हकल्याशिवाय आम्ही गप्प बसवणार नाही. असा इशारा आमदार पी. एन पाटील यांनी दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलना वेळी आमदार पी. एन. पाटील बोलत होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने, आज पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सत्याग्रह आंदोलनामध्ये, आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर देशाची लोकशाही संपवून देश हुकूमशाहीकडे घेऊन निघालेल्या मोदी सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिवाय राहुल गांधी यांच्यावर चुकीची कारवाई करणाऱ्या मोदी सरकार चले जावच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनी, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि त्याला मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहून भाजपची सत्ता निघून जाते असे दिसायला लागल्याने राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने मोदी सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. अदानी, अंबानींना हा देश विकण्याचे पाप मोदी सरकार करत आहे. देश संपणार हे आता दिसत असल्याने सत्याच्या मार्गाने राहुल गांधी लढा देत आहेत. मात्र भाजप सरकार त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असून आता भाजपला हकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही आमदार पी एन पाटील यांनी यावेळी दिला.
आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देशभर लोकप्रियता वाढत आहे आपली सत्ता जाणार अशी भीती आता भाजपला वाटत असल्याने, खोट्या गुन्ह्यात अडकवून राहुल गांधी यांना रोखण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू आहे. देश हुकूमशाहीकडे निघालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा आंदोलनाच्या माध्यमातून भाजपला सडेतोड उत्तर देण्याचे काम काँग्रेस करत राहणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.ज्याप्रकारे महात्मा गांधींनी इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते, त्याच पद्धतीने काँग्रेसने महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ हे सत्याग्रह आंदोलन करत मोदी सरकारच्या चुकीच्या कारवाईचा यावेळी तीव्र निषेध केला. राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. या सत्याग्रह आंदोलनामध्ये, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, बाजीराव खाडे, माजी नगरसेवक शशांक बावचकर, माजी नगरसेविका भारती पोवार, गुलाबराव घोरपडे, सरलाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, शहराध्यक्ष उदय पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सुर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, बाबासो चौगले, विद्याधर गुरबे, बयाजी शेळके, किशोर खानविलकर, महमंद शेख संपत चव्हाण-पाटील संजय वाईकर यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष , माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.