Thursday, June 26, 2025
spot_img
Homeताज्यात्या माउलीची आर्त हाक कोणाला ऐकू येईल का? आई व मुलगा दोघांचीही...

त्या माउलीची आर्त हाक कोणाला ऐकू येईल का? आई व मुलगा दोघांचीही अवस्था केविलवाणी; माणुसकीची गुढी कोण बरं उभारेल

त्या माउलीची आर्त हाक कोणाला ऐकू येईल का? आई व मुलगा दोघांचीही अवस्था केविलवाणी; माणुसकीची गुढी कोण बरं उभारेल?

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचा सण. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृध्दी, उत्तम आरोग्य घेवून येवो, अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या, घेतल्या जात असताना एका कुटुंबाची अक्षरक्ष: वाताहत झालीय. आज एका घरात ही गुढी आज उभारली गेलेली नाहीए, घरासमोर ना सुंदर रांगोळी आहे, ना घरात काही गोडधोड बनलेल, याच तितकच वाईट वाटतय. कारण या घरातील दोन सदस्य आज बेवारश्‍याप्रमाणे व हालाखीचे जीवन जगताहेत. त्यांना कोणीच वाली नाही. एक पन्नाशीमध्ये असलेल्या मुलगा अंथरुणाला खिळून एकाकीपणाच जीवन जगत आहे तर त्याची वयोवृद आई खाजगी दवाखान्यात आजारपणामुळे उपचार घेत आहे. काही संवेदनशील घटकांनी त्यांना मदत केल्याने हे शक्‍य होत आहे. मात्र, त्यांच्या मदतीला धावून जाणार आणि आपली म्हणावी, अशी कोणतीच माणसं आसपास नाहीऐत. मुलगा घरात राहून आईची आणि आई दवाखान्यात राहून मुलाची काळजी करण्यापलिकडे काहीच करु शकत नाहीऐत. हे दोघेही ऐकमेकांच्या काळजीच्या विचारानं सैरभैर झालीहेत. आमच कस होणार, या एकाच विचारानं त्या माउलीचे डोळे क्षणाक्षणाला डबडबले जाताहेत. मात्र, त्यांच्या मदतीला पडणार, हाकेला ओ देणारं, आज इथं कोणीच नाही, याच खर दु:ख वाटतय. त्यांना यथाशक्ती मदत करुन, त्यांच्या गरजेला उपयोगी पडून, वैद्यकीय सहाय्य देवून खरतर माणुसकीची गुढी आज उभारण्याची बांधिलकी कोण बरं जपेल, हा पडलेला प्रश्‍न आहे.
आपल्या घरात कोणी आजारी असेल तर आपलं लक्ष कामात लागत नाही किंवा हे आजारपण जास्तच बळावल तर सर्वकाही विस्कळीत होवून जात. त्यात जर आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असेल तर अवस्था मेल्याहून मेल्यासारखी होवून जाते. मग इतरांकडे हात पसरल्याशिवाय पर्याय उरत नाही आणि कोणी थोड, थोडकं दिलेलं पूरतही नाही. थोडक्‍यात काय तर सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी तोंड दाबून बुक्‍याचा मार सहन करण्यासारखी परिस्थिती ओढावते. ही परिस्थिती नक्कीच वाईट असते, अशी वेळ कोणावरही येता गामा नये आणि दुर्दैवाने ती आलीच तर त्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असायला हवे. तेवढीही ताकद आणि कुटुंबातील सदस्य ह्यात नसतील तर … ? तर अंथरुणावर खेळलेल्या व्यक्तीला बघणार कोण, सांभाळणार कोण असा यक्ष प्रश्‍न उभा राहतो. त्यात जर कुटुंबातील एक व्यक्ती विकलांग असेल, तिला वैद्यकीय मदतीची आवश्‍यकता असेल आणि ती अंथरुणाला खेळून राहिलेली असेल आणि त्याच घरातील दुसरी व्यक्ती वयोवृध्द असल्याने आजारी पडली, तिला उपचारासाठी दवाखान्यात काही दिवस दाखल करावे लागले तर या दोघांच्या जीवनाच नक्की होणार काय? त्यातही या दोन्ही व्यक्ती नात्याने आई व मुलगा असतील तर… कोणी कोणाला पाहायचे. त्यांची सेवा सुश्रूषा कोणी करायची, ऐकमेकांचे आधार असणाऱ्या या दोघांच्याही जीवाची होणारी घालमेल आणि होणारी अंतरिक तळमळ कोणी पाहू शकेल का? आणि कोणी हे पाहू शकत असतील तर आजच्या कोरोनाच्या संकटात त्यांच्या मदतीला देवदुतासारख्या त्या मदतीला धावून येतील का, हाच आणि हाच प्रश्‍न आज त्यांना सतावत असेल. आज ही परिस्थिती कोल्हापुरातील जरगनरातील श्रीमती पुष्पा कुलकर्णी-उपळेकर यांच्यावर आली आहे. त्या आज पाठीच्या मणक्‍याच्या आजार बळावल्याने एका दवाखान्यात उपचार घेताहेत. तर त्यांचा एकुलता एक मुलगा शेखर विकलांग अवस्थेत घरात एकटाच राहतोय. या दोघांची झालेली केविलवाणी अवस्था कोणाला दिसणार आहे की नाही आणि ही परिस्थिती दानशूर व संवेदनशील व्यक्ती बदलू शकतील का, हा प्रश्‍न सतावत आहे.
खरे तर श्रीमती पुष्पा कुलकर्णी-उपळेकर या पूर्वाश्रमीच्या फलटणमधील उपळेकर श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच आणि त्यांच्या वडिलांचे जुने संबंध होते. एका साखर कारखान्याचे ते एक्‍झिक्‍यूटिव्ह डायरेक्‍टर होते. मात्र, पुष्पा यांच्या लग्नानंतर परिस्थिती बदलली. शोकांतिका अशी की, नियतीने त्यांना व त्यांच्या मुलाला रस्त्यावर आणून सोडले. तेव्हापासून त्यांचा दुर्देविलास सुरु झाला आणि संपायचे काही नावच घेईना. शेखर कुलकर्णी हे कोल्हापुरातील एका उदयोगपतींकडे कामाला होते. मात्र, गतवर्षीच्या लॉकडाउनच्या काळात त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आणि त्यांना घरी रहावे लागले. घरात असताना एकेदिवशी ते जिन्यावरुन खाली पडली, त्यात डोक्‍याला दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या परिस्थितीची माहिती समजल्यावर समाजमन सामाजिक संस्थेने मदतीचे आवाहन केले. प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी समाजमन संस्थेशी संपर्क साधून कुलकर्णी विषयी माहिती घेतली आणि पुढे शेखर यांच्या गुंतागुंतीच्या ऑपरेशनासाठी सव्वा लाख रुपयांचे वैदयकीय मदत अदा केली. सावली केअरचे श्री. किशोर देशपांडे यांनीही बांधिलकी जोपासून शेखर यांना सावलीत दाखल करुन त्यांच्यावर दोन ते तीन महिने मोफत फिजोओथेरपी केली. मध्यंतरी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड या संस्थेनेही महिनाभर शेखर यांना उपचारासाठी दाखल केले होते. यासाठी श्री. देशपांडे यांनी पुढाकार घेतला होता.
यानंतरही कुलकर्णी कुटुंबियांचे हाल किंवा दृष्टचक्र थांबलेले नाही. आताच्या लॉकडाउनमध्ये श्रीमती पुष्पा कुलकर्णी या आजारी पडल्या आहेत. तपोवनमधील एका दवाखान्यात गेल्या काही दिवसांपासून त्या मणक्‍याच्या आजारावर उपचार घेत आहेत. तर शेखर जरगनगरातील घरात एकटाच आहे. शेजारील माणस, त्यांची विचारपूस करताहेत. त्यांनाही फिजोओथेरपीची आवश्‍यकता आहे. आज या आई व मुलाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या उपजिविकेचाही प्रश्‍न गंभीर रुप धारण करत आहे. पुष्पा कुलकर्णी या पूर्वी कोल्हापुरातील अपंग संघटनेच्या विविध पदावर कार्यरत होत्या. या माध्यमातून त्यांनी आजवर अनेकांना न्याय मिळवून दिलाय. मात्र, आज त्यांच्या मदतीला धावण्याची आवश्‍यकता निर्माण झालीय. आपली एक धाव आणि मदतीचा हात या दोघांचे उर्वरित आयुष्य सूकर बनवू शकतो. यासाठी कोणी तरी पुढाकार घ्यायला हवाय. एवढीच माफक अपेक्षा.
– महेश गावडे
पत्रकार तथा समाजमन संस्था अध्यक्ष, कोल्हापूर.
माणसातल्या… देवा धाव रे, देवा पाव रे…
माणुसकीची गुढी उभारेल का कोणी?
दु:खितांचे अश्रू पूसेल का कोणी?
सुख, समृध्दी यावी सर्वांच्याच घरी
धावेल का कोणी त्यांच्या मदतीला?
ज्यांचे नाही जगात या कोणी वाली….
….
अधिक माहितीसाठी संपर्क़.९८२३७६७८५८,९८३४९८९५१९,९३२५४०३२१३,९९७०६३१३१३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments