महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, हे सांगणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, हे सांगणारा अर्थसंकल्प आहे. उत्पन्न घटल्याचे रडगाणे न सांगता राज्यातील शेतकरी, महिलांच्या आशा, आकांक्षा यांना बळ देणारा आणि ग्रामीण व नागरी विभागाच्या विकासाला गती देणारा हा महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प आहे. कोरोना संकट काळात शेतकऱ्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रातून अर्थचक्राला वेग दिला. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याच्या निर्णयामुळे शेतीला फायदा होणार. कोरोनाच्या कठीण काळात महिलांनी घराघराला आणि राज्याला धीराने सांभाळले. महिलांच्या या कर्तबगारीला अर्थसंकल्पातून मानवंदना दिली आहे. गृह विभागात स्वतंत्र महिला राखीव दलाच्या स्थापनेचा निर्णय क्रांतिकारी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून शालेय विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सुविधा मिळाली आहे. परिवहन विभागासाठी २७०० कोटींची तरतूद केल्याने बसस्थानकांचे रूप पालटणार आहे. घरकुल योजनेसाठी भरीव तरतूद केल्याने गरिबांना घरे मिळण्यासह बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगला अर्थसंकल्पातून चालना मिळाली आहे. तसेच प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारामुळे खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य उजळणार आहे. सर्व विभागांचा समतोल साधून राज्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर यांनी दिली आहे.