कोल्हापूरमधील नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायधीशांनी सुनावली शिक्षा
कोल्हापूर/प्रतिनिधी : २०१४ मध्ये कोल्हापुरातील टेंबलाईवाडी रेल्वे उड्डाणपुलानजीक घडलेल्या दुहेरी खून प्रकरणातील नऊ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली. सात वर्षापासून हा खटला सुरू होता. जिल्हा न्यायाधीशांनी आज शनिवारी या प्रकरणातील आरोपींना ही शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता.
दोन फेब्रुवारी २०१४ रोजी टेंबलाईवाडी उड्डाणपूल परिसरात नितीन महादेव शिंदे व समीर सिराज खाटिक यांचा पाठलाग करुन खून करण्यात आला होता. आरोपींनी तलवार, चाकू व दगडाने वापर करुन खून केल्याचे चौकशीत सामोरे आले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी खून खटल्यामुळे संपूर्ण शहर हादरले होते. या खुनातील आरोपी जयदीप चव्हाण, साहिल कवाळे, रियाज देसाई, सागर गिरी, फारुक अहमद शेख, सद्दाम हुसेन देसाई, इम्रान मुजावर, धनाजी मिसाळ, रोहित सुधीर कांबळे यांना शिक्षा झाली आहे. सगळे आरोपी ही विक्रमनगर व टेंबलाईवाडी परिसरातील आहेत.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक वकील एम. बी. पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण ३४ साक्षीदार तपासले.