खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला
तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत असू नये नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेतील कसबा करवीर रि.स.नं.६२५/१ व २ येथील खेळाचे मैदान वाचनालय व आरक्षण ऐवजी रहिवास विभागात बदल व्हावे या ऑफिस प्रस्तावावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी जोरदार चर्चा केली. नगरसेवकांनी हा विषय विरोध दर्शवत हाणून पाडला आणि यात कोणताही बदल न करता या ठिकाणी खेळाचे मैदान व वाचनालय असेच आरक्षण राहील असे जाहीर केले.सुमारे ९० गुंठे जागेची ७० कोटींची किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हायकोर्टाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला. संबंधित वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली. वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचे मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.१९८६ पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाऊन प्लॅनिंग विभागाने काय काम केले, असा सवाल उपस्थित करत २०२२ मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आज झालेल्या सभेमध्ये झूम प्रकल्पाच्या येथे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी करणे या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. आणि भटक्या कुत्र्यांचे शेल्टर नागरी वस्तीमध्ये न उभारता महानगरपालिकेच्या असणाऱ्या अधिकृत जागेवर उभारावे अशी मागणी जोर धरली.
कोल्हापूर महानगरपालिकेची आज पाचवी सर्व साधारण सभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये महापौर.सौ. रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेमध्ये विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
मुळात हा जागेचा विषय सभेमध्ये का काढला अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली.या सभेमध्ये नगरसेवकांनी म्हणजेच आदिल फरास, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर या सर्वांनी जागा आरक्षण असताना रहिवास विभागात केली जात असेल तर आरक्षण बदलाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकावून सांगितले. महानगरपालिकेच्या ४० जागा वर्ग झालेल्या आहेत अशामध्ये टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट महानगरपालिकेला लुटत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला. यामध्ये नियोजन करण्याची जबाबदारी या विभागाची आहे मात्र ते जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला मी आणि नगरसेवक विनायक फाळके शिवाजी विद्यापीठाच्या जागेसाठी पाच वेळा मुंबईला जाऊन आलो आहे मात्र एकाही अधिकाऱ्याने मुंबईला जाण्याचे धाडस केले नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही जागा टाऊन प्लॅनिंग विभागाच्या निष्क्रियतेमुळे हातून गेली असल्याचे जयंत पाटील म्हणाले यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असे काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर यांनी सभेमध्ये सांगितले.
ज्या ज्या जागा महापालिकेच्या आहेत त्या सर्व जागांवर महानगरपालिकेचा बोर्ड लावा अशी मागणी लाटकर यांनी केली अधिकारी हायकोर्टाचे नाव घेऊन नगरसेवकांना पुढे करत आहेत अशा अनेक जागांबाबत योग्य भूमिका नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतली असल्याचे आदिल फरास यांनी निदर्शनास आणून दिले आरक्षण हटवून वेगळे काहीतरी करणे ही भूमिका नेत्यांची नव्हती कोल्हापुरी क्रीडा नगरी आहे शाहू महाराजांनी याठिकाणी खेळांची मैदानी दिली आहेत त्या ठिकाणी वेगळा काहीतरी करण्याचा घाट घातला जात असेल तो आम्हाला कदापि मान्य नाही अशी भूमिका आदिल फरास यांनी घेतली.यावेळी सभेमध्ये नगरसेविका पूर्वा राणे यांनी लोकांचे मत विचारात न घेता रहिवास उभारणी केली जात असेल तर याचा निषेध करतो अशी भूमिका मांडली हा विषय सभागृहात का आणला असे म्हणत नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शारंगधर देशमुख यांनी अधिकारी दुकान चालविण्याचे काम करत असल्याचा आरोप केला
नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी झूम प्रकल्पाच्या शेजारील जागेत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभा राहत असेल तर त्यास मान्यता दिली जाणार नाही, या विषयावर बोलताना नगरसेवक अर्जुन माने यांनी बिगर वस्तीच्या ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर उभारावे असे सांगितले.लाटकर यांनी एक हजार कुत्र्यांचे शेल्टर तयार करा मात्र ते महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर असावे आणि नागरी वस्तीत असू नये असे सुचित केले या विषयावर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी नागरी वस्तीमध्ये कुत्र्यांचे शेल्टर असू नये असा सूर आहे. हलसवडे येथे कुत्र्यांची शेल्टर उभारण्यासाठी याआधी विचार झालेला आहे मात्र जागा निश्चिती झाली नाही असे स्पष्ट केले.कुत्र्यांचे शेल्टर कोल्हापूर शहरांमध्ये उभ्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक लावली जाईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. शिवाय महापौरांनी सुरुवातीलाच ‘ड’ वर्ग महापालिका ‘क’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून स्मार्ट कोल्हापूरसाठी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे घोषित केले आणि नगरसेवकांना इंदौरचा अभ्यास दौरा करण्याचे नियोजन केले जाणार आहे या अभ्यास दौऱ्याअंतर्गत त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती नगरसेवकांना होईल आणि त्या पद्धतीने कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये काही करता येईल का याचा विचार होईल असे सांगितले.
शिवसेना गटनेते प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैशिष्टपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरु आहेत याची सभागृहात माहिती देण्याची माहिती मागितली. यावेळी प्रशासनाकडून आगामी महासभेपुर्वी याची लेखी माहिती सभागृहात द्यावी अशी महापौरांनी सूचना केली.याशिवाय, लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा, तसेच दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एकूणच, विविध मुद्द्यांवर प्रशासनावर टीका आणि जोरदार चर्चा होत आजची महासभा गाजली.
सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर गौरी चौगुले, तेज पाटील, झिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी कामकाज पाहिले.
आजच्या सभेमध्ये माजी महापौर स्वाती यवलुजे, जयश्री चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका माधुरी नकाते, पूर्वा राणे, नेहा तेंडूलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं.

