स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर महानगरपालिकेची आजची स्थायी समिती सभा चांगलीच वादळी ठरली. आज झालेल्या स्थायी समिती सभेत ऐनवेळी विषय घुसविण्यात आले आणि त्यास विरोधी सोडून बाकीच्या सदस्यांनी मंजुरी दिली यात आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ऐनवेळी विषय घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विरोधक सदस्यांनी स्थायी समिती सभापती आणि प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थापिका ताराराणी सभागृहात सातवी स्थायी समितीची सभा वादग्रस्त झाली.सभेमध्ये विषय पत्रिकेवरील रेसकोर्स नाका, टिंबर मार्केट येथील जीर्ण व धोकादायक झालेली कमान व जकात नाका इमारत निष्कासित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. तसेच नागरिक व ठेकेदारांकडून विविध कारणांसाठी जमा झालेल्या अनामत रक्कम परत करण्याबाबतचे प्रस्तावही स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती मधील विरोधी पक्षाच्या सदस्यांशी कोणतेही चर्चा न करता सभापतीनी अचानक चार-पाच विषय घुसवण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी आलेल्या विषयांमध्ये सरस्वती गाळेधारकांना गाळे देणे, आरोग्य विभागासाठी जेसीबी, ट्रक्टर ट्राली यासह विविध उपकरण खरेदी करणे आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल हे विषय घेण्यात आले. पण विरोधक सदस्यांनी या विषयावर अभ्यास करून पुढच्या सभेत मंजुरी घेवू असे सांगितले. मात्र, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी “ माझा आदेश आहे, सर्व विषय मंजूर करा” असा सभेमध्ये आदेश दिला. त्यामुळे विरोधक सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यावर माध्यमांशी बोलताना, आम्ही कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्यावरील विषय आणले होते. मात्र विरोधी सदस्यांनी चर्चा न करता सभा त्याग केल्याचे सांगत सभापती शिराळे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी विरोधक सदस्यांचा निषेध नोंदवला.
तर सभापती विशाल शिराळे हे नेमकं कोणाच्या हातचे बाहुले आहे. त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच शहराचे महत्वाचे विषय ऐनवेळी घुसवून मंजूर का केले. त्यांचा आम्ही निषेध करतोय असे काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर ऐनवेळी आर्थिक बजेट असलेली विकास कामं अचानक सभेत आणुन त्यांना नेमकं काय हितसंबंध जपायचे आहेत असा करत आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सभापतींचा निषेध नोंदवला.
ऐनवेळच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कोटीचे विषय आणून मंजूर करणाऱ्या सभापतींच्या मनमानी कारभाराचा नगरसेवक अमर समर्थ यांनी निषेध नोंदवला.तर पस्तीस लाख रुपये भाड्याचे टँकर घेण्यापेक्षा महापालिकेने स्वतः टँकर खरेदी करावेत अशी आमची भूमिका आहे.म्हणून आम्ही सभात्याग केला असे नगरसेवक प्रताप जाधव यांनी सांगितले.सभेत ऐनवेळचे विषय आणण्यापूर्वी गटनेत्यांच्या बरोबर चर्चा व्हायला हवी होती. पण असे न करता आमच्यावर विषय लादण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी निषेध नोंदवला.तर विरोधक सदस्य म्हणून आम्ही ऐनवेळी आलेल्या विषयांना अभ्यास केल्याशिवाय मंजुरी देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे प्रवीण सोनवणे यांनी सांगितले.
एकूणच, ऐनवेळी विषय घुसवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप असून, पारदर्शक कामकाजाची मागणी करत त्यांनी सभात्याग केला. आता या वादाचे पडसाद पुढील होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

