पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय असणार खास आकर्षण

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना.श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफसो, माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष ना.श्री.राजेश क्षीरसागर,मा. खासदार श्री. धैयशील माने,
मा. आ. श्री. विनय कोरे, आ.राहुल आवाडे,मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर श्री. अमोल येडगे,पोलिस अधीक्षक श्री .योगेशकुमार गुप्ता,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, एस.कार्तिकेयन,मा. आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी,भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विजय जाधव,भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व मा. श्री. राजवर्धन निंबाळकर पूर्व, आणि मा. श्री. विजय पाटील अध्यक्ष, कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन श्री.विजय पाटील,भगिरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची
माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.
याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.

प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *