रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक याच उदरनिर्वाहावर अवलंबून आहेत. परंतु, रंकाळाचे विद्रुपीकरण करून, सौंदर्यात बाधा येत असेल तर त्यास आपण पाठीशी घालणार नाही, रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे प्रसिद्धीपत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यात पुढे म्हंटले आहे कि, काही दिवसांपूर्वी रंकाळा तलाव परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी फेरीवाले संघटना स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सदर संघटनेच्या उद्घाटनाकरिता सदर ठिकाणी गेलो असता सांगण्यात आलेली बाब आणि प्रत्यक्षात करण्यात आलेली कृती वेगळी असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अतिक्रमणास कोणत्याही प्रकारे मी मान्यता दिली नाही. यावेळी स्थानिक नागरिकांनी परप्रांतीय लोक याठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी गाळे घेवून व्यवसाय करण्यास मर्यादा असल्याचे गाऱ्हाणे मांडले. *रंकाळा तलाव ही कोल्हापूरची अस्मिता आहे. नागरिकांनाही व्यवसायासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येईल. परंतु, सौंदर्याला बाधा पोहचेल असे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना संबधित स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत.आगामी काळात अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबतीतही आपण संबधितांची बैठक घेवून तलावाचे कोणतेही नुकसान किंवा प्रदूषण फेरीवाल्यांच्या कृतीमुळे होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासह निधीच्या माध्यमातून असेल, नाविन्यपूर्ण अशी विद्युत रोषणाई, म्युझिकल फौंऊटेन, सेल्फी पाँइंट आदी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी आपले नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीचा रंकाळा आणि आताच रंकाळा यात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी या पत्रकात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *