कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. पोलीस महासंचालक साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये वास्तव्यास असलेल्या व शिक्षणासाठी आलेल्या ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ पोलीस व नागरी अधिका-यांशी संवाद साधला.
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ बी धीरजकुमार सोो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील शहर विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री आप्पासाहेब पवार शाहुवाडी विभाग, व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर करवीर विभाग, पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा यांचे उपस्थितीत ईशान्य राज्यांतील विद्यार्थी कोण कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, ते वास्तव्यास कोठे आहेत त्यांना काय अडचणी आहेत याबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव देखील कथन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने संपूर्ण सहकार्य व संरक्षणाची हमी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना डायल ११२ आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख तसेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
एकंदरीत, “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम कोल्हापूर जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात आला असून ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास तो उपयुक्त ठरला आहे.

