महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनास विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून, ते बँक कर्मचारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे दोन दिवसीय अधिवेशन सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होणार आहे,अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम.देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच विदेशी बँकांमधील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बैंक कर्मचारी संघटनांचे कार्यकर्ते जोमाने तयारी करत आहेत.
याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता, त्याच ठिकाणी तरुण सिने दिग्दर्शक, लोकसत्ता दैनिकाचा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारप्राप्त वरुण सुखराज यांच्या निर्मितीतील “दि
ग्रेट बैंकिंग इल्यूजन” या माहितीपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वरुण सुखराज स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता, त्याच ठिकाणी नवीन कामगार कायदे या अत्यंत महत्वाच्या विषयावर
निवृत्त प्रादेशिक कामगार आयुक्त
धनराज एस. जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सध्या केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत पुन्हा एकदा एकत्रीकरण व खाजगीकरणाची धोरणे राबवण्याची भाषा केली जात आहे. संघटनेचा या धोरणांना ठाम विरोध असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या ठेवी असुरक्षित होण्याचा धोका निर्माण होतो. शेतकरी, छोटे व्यापारी व लघुउद्योग पुन्हा एकदा बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, कारण खाजगी बँका प्रामुख्याने नफ्यावर आधारित कार्य करतात.
संघटनेची अशी ठाम भूमिका आहे की, बँकिंग सेवा ही मूलभूत हक्क म्हणून घोषित झाली पाहिजे. तसेच सामान्य बचत खातेदारांकडून कोणतेही सेवा शुल्क आकारले जाऊ नये. याशिवाय कॉर्पोरेट थकबाकीदारांकडून कोणतीही सवलत न देता संपूर्ण थकबाकी वसूल केली जावी. अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
या अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी संबंधित असंघटित कर्मचारी बैंक मित्र, आऊटसोर्ड व कंत्राटी कर्मचारी – यांना संघटित करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच पुरेशी नोकरभरती, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने बैंकिंग उद्योग आणि बँक कर्मचारी चळवळीसमोरील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर सखोल आणि व्यापक चर्चा घडून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेस कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, कॉम एन शंकर, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *