Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 24

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

0

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत म्हणाल्या की, “आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतः साठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सतत सेवारत असणाऱ्या हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप संस्थेमधील अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू”.
‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर मध्ये अपंग पुनर्वसन आणि शिक्षणाचा अत्यंत मूलभूत आणि स्तुत्य काम करत आहे. हे काम करताना अनेक अडचणींवर मात करून येथील विद्यार्थ्याच्या जीवनात चैतन्य आणि आणि आनंद भरणारे येथील शिक्षक म्हणजे निस्वार्थ सेवाकार्याचे मूर्तिमंत प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना या संस्थेतील श्री.देवानंद भाडळे, कु. अंजना लागस, मिलिंद गुरव, श्री सचिन वसावे , सौ.मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, सौ.मुग्धा गोरे-लिंगनूरकर, श्री.मनोज शेडगे, सौ.संजीवनी कोळी, सौ.विभावरी सावंत व श्री.संदीप मोरे या १० शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.या सोहळ्याला सलोनी घोडावत, डॉ. ममता बियाणी,निलाभ केडिया, निकेत दोशी,निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका या सोबत कोल्हापूर आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्व चे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

0

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ‘एज्युकेशन वर्ल्ड’ संस्थेमार्फत महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील डे कम बोर्डिंग विभागातील नंबर वन स्कूलचा किताब मिळवला आहे. दिल्ली-गुडगाव येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, “प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव मिळाला आहे.”
या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो.”चेअरमन श्री संजय घोडावत आणि विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, बोर्डिंग प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, ज्यु कॉलेजचे प्राचार्य श्री नितेश नाडे, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य श्री अस्कर अली, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी आभार मानले.

घोडावत विद्यापीठात एम. फार्म कोर्स सुरू

0

घोडावत विद्यापीठात एम. फार्म कोर्स सुरू

फार्मसी कौन्सिलचे विजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अतिग्रे/,प्रतिनिधी : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एम.फार्म कोर्स -फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स असे दोन कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली होती.या कोर्सचे उद्घाटन कौन्सिलचे सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.फार्मसी व्यवसायाची सद्यस्थिती, उदयोन्मुख ट्रेंड आणि उद्योगाचे भविष्य,टीमवर्कचे महत्त्व आणि कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निवडीचे निकष अधोरेखित केले. फार्मसी हे आरोग्य सेवेमध्ये आघाडीवर आहे अशा अभ्यासक्रमावर भर द्यायला हवा.हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात योगदान देण्यासाठी तयार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुलगुरू प्रा.उद्धव भोसले यांनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील पदवी, व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य याचे महत्त्व पटवून दिले. यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या फिनिशिंग स्कूल विषयी माहिती दिली. तसेच डीन डॉ. सुभाष कुंभार, डॉ.जीवन लवांडे, विभाग प्रमुख डॉ. विद्याराणी खोत यांनी हा कोर्स सुरू करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक उपस्थित होते.
यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डॉ. व्ही.व्ही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी समर्थ व मुबिशिरीन इनामदार यांनी केले तर डॉ.कुंभार यांनी आभार मानले.

गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या वतीने ‘ती ‘ गाण्याचा कार्यक्रम

0

गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या वतीने ‘ती ‘ गाण्याचा कार्यक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगभरातील गरजू व्यक्तींसाठी सातत्याने गेली ११९ वर्षे कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनल या जगप्रसिद्ध संस्थेचा “रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर,’ हा कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणारा क्लब आहे. महिला, लहान मुले आणि वृद्ध यांच्या शारीरिक, मानसिक समस्या, विद्यार्थ्यांच्या गरजा, निसर्गाची हानी कमीत कमी व्हावी याची काळजी, परिसर स्वच्छता, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा रिसायकलिंग आणि असे इतर अनेक उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो.
यासाठी आम्ही स्वतः सर्व खर्च करतोच पण कोल्हापूरसारख्या दातृत्वावान लोकांनी भरलेल्या नगरीतून आम्हाला सतत मदतीचा हात सुद्धा मिळत असतो.
काही मोठ्या उपक्रमांसाठी आम्ही निधी जमा करत आहोत, आणि यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. अर्थात ही मदत घेताना पैश्यांचा योग्य विनियोग केला जाईल याची काळजी घेतली जाईल. यासाठीच अनोख्या अश्या “ती” नावाच्या गाण्याच्या मैफिलीचे अयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता, आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती प्रोजेक्ट चेअरमन रोटरियन वारणा वडगावकर आणि को – चेअरमन रोटरीयन राजेंद्र जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनांमुळे स्थानिक कलाकारांना वाव मिळेल, तसेच गरजूंना मदतीचा हात मिळेल. यातून मिळणारा सर्व निधी हा सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस रोटेरियन पुरुषोत्तम खटवानी, रोटेरियन बाबा जांभळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने “केएमए – कॉन २०२४ दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे” आयोजन

0

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने “केएमए – कॉन २०२४ दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे” आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या शिखर संस्थेच्या वतीने केएमए – कॉन २०२४ ही वैद्यकीय परिषद येत्या १९ आणि २० ऑक्टोंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.”डॉक्टर बियोंड मेडिसिन ३६० ” असे यावर्षीच्या परिषदेचे ब्रीदवाक्य असून केएमए-कॉन परिषदेला यंदा विशेष महत्त्व आहे. अशी माहिती मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.                        १०० वर्षांच्या वारशासह, केएमएने वैद्यकीय समुदायाच्या प्रगतीसाठी आणि रुग्ण उपचारासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.याचबरोबर दोन दिवसीय चालणाऱ्या या वैद्यकीय परिषदेमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होणार आहे. वैद्यकीय आणि नैसर्गिक दृष्टीकोनांसह विविध जीवन पद्धतींचे ज्ञान एकत्रित करून आरोग्य, रोग या दैनंदिन आव्हानांना डॉक्टरांनी कसे सामोरे जायचे यावर विशेष चर्चा होणार आहे.                     परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वजन नियोजन आणि नियंत्रण, मेडीटेशन, वैद्यकीय सेवेतील कायदेशीर तरतुदी, डॉक्टरांकरिता आर्थिक नियोजन या विविध विषयांचा समावेश आहे.या परिषदेस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पाचशे हुन अधिक डॉक्टर एकत्र येऊन “आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार” या उपचार पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण करतील. या वर्षी डॉ. अतुल जोगळेकर पुरस्काराने मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध भूलतज्ञ शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अवयव दानाकरिता जनजागृती रॅलीचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत सयाजी हॉटेल ते शिवाजी विद्यापीठ या मार्गाने करण्यात येणार आहे.                                                           पत्रकार परिषदेला केएमएचे सचिव डॉ. शितल देसाई, परिषदेच्या सह- अध्यक्षा डॉ. सरोज शिंदे,डॉ. अर्चना पवार, परिषदेच्या सचिव डॉ. सरोज शिंदे, वृत्त प्रवक्ते डॉ.प्रवीण नाईक,डॉ . आशा जाधव,डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. महावीर मिठारी, डॉ. ए.बी पाटील, डॉ. सूर्यकांत मस्कर, डॉ. कृष्णा केळवकर,डॉ. अभिजीत तगारे, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ.आर.एम. कुलकर्णी, डॉ. प्रवीण वडगावे, डॉ.आश्विनी पाटील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

0

विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

साने गुरुजी वसाहत/प्रतिनिधी : दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेले ज्येष्ठांसाठी व युवक युवतींसाठी केलेल्या विकास कामाच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. साने गुरुजी येथील आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून साकारलेल्या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरला आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, यासाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. एमआयडीसीच्या धरतीवर कमी खर्चात आयटी कंपनींना जागा उपलब्ध करून देण्यात यावी. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे साडेसात हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी व्हावी व उपनगरातूनही तरुण-तरुणी अधिकारी बनावेत, यासाठी दक्षिण विभागात पाच अभ्यासिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी चार कोटी चा निधी उपलब्ध आहे.                                                           शाहू अध्यासन केंद्राचे डॉक्टर जे. के. पवार यांनी प्रास्ताविकामध्ये अभ्यासिकेचे महत्व व हेतू स्पष्ट केला.यावेळी व्यासपीठावर माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास बापू कदम, भुपाल शेटे, मच्छिंद्रनाथ देशमुख, संपतराव गायकवाड, सदानंद कवडे, सुयोग वाडकर, अभिजीत चव्हाण, गुरुप्रसाद जोशी आदी उपस्थित होते.

चौकट

अभ्यासिकेला श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे नाव
विद्येचे मंदिर उभारणाऱ्या श्री वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे नाव अभ्यासिकेला देण्यात यावे, असा प्रस्ताव दिला. त्यास तातडीने आमदार सतेज पाटील यांनी मान्यता दिली.

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आईसाहेब श्रीमती प्रेमला पंडितराव जाधव, माजी नगरसेविका वहिदा सौदागर, वैभवी जरग, रिलस्टार डॉ. शिवानी खामकर, राजमती सावंत, राजकुवर सावंत, नेहा होमिओपॅथिक असोसिएशनच्या सदस्या डॉ. सुषमा जगताप, डॉ. मंजुश्री मोरे, डॉ. दिपाली मॅडम, राष्ट्रीय काँग्रेस युवती विभागाच्या शहराध्यक्ष अंजली जाधव, निर्मला सालढाणा, विद्या घोरपडे, रजत ओसवाल, सोहन टिंडवानी, स्वप्नाली जगोजे, साहिल भारती आदी उपस्थित होते.                      रास दांडियामध्ये युवती, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. नॉनस्टॉप म्युझिक, डीजे आणि दांडियाच्या तालावर सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. पारंपारिक वेशभूषेत महिला व युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.रास दांडिया मध्ये विविध स्पॉट गेमने धमाल उडवली. तसेच नृत्याचा आनंद घेताना फाउंडेशनच्या वतीने विविध गटात बक्षीस देण्यात आली.विविध गटातील विजेते पुढीलप्रमाणे : दांडिया ग्रुप : डेलिया ग्रुप (रंकाळा स्टॅन्ड), सनेडो ग्रुप (भक्तीपूजानगर), शरण्या ग्रुप (सम्राटनगर), उत्तेजणार्थ – गर्ल्स फॉरेव्हर (मंगळवार पेठ), विश्वशांती गरबा क्वीन ग्रुप (सम्राट नगर), करवीर निवासिनी ग्रुप (लाईन बझार, कसबा बावडा). गरबा क्वीन : जैना ओसवाल. बेस्ट ड्रेपरी : संपदा चव्हाण. राधाकृष्ण वेशभूषा : प्रीती पेडणेकर -नलिनी मेंगे, सपना शिंदे – अनिश शिंदे. दांडिया सजावट : स्मिता गुंदेशा. बेस्ट सेल्फी : श्रावणी सूर्यवंशी, अमरजा जाधव, रितल मालवणकर. लाईव्ह रील : सान्वी बाबर, श्रावणी बाबर, निशिगंधा पंडत, भाग्यश्री पाटील. उत्साही जेष्ठ नागरिक महिला : प्रीती पवार.या रास दांड्या कार्यक्रमात उपस्थित महिलांच्यामध्ये लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंत महिलेस दोन रात्री व तीन दिवसाची गोवा ट्रिप देण्यात आली. गोवा ट्रिपच्या विजेत्या सुप्रिया कारेकर ठरल्या.

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

0

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवत आहेत. स्कूल, विद्यापीठ यांच्यामार्फत सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाले आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत. या यशाचे श्रेय विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी, संचालक श्री वासू ,संचालक-प्राचार्य सस्मिता मोहंती, इतर सर्व डीन, प्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे आहे.या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून संजय घोडावत यांचे अभिनंदन होत आहे.

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

0

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो म्हणजे ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे एक वेगळेच रूप यात आहे.
टिझर आणि ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली बनवलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. आपल्या कल्पक दिग्दर्शन शैलीद्वारे पवार यांनी ‘नाद’मध्ये एक अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. या चित्रपटात उदय आणि शुभ्रा यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल. या चित्रपटातील अजिंक्य ही आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ‘नाद’ हा म्हणजे दोन प्रेमी जीवांची आवड पूर्ण करण्याचा प्रवास आहे. या चित्रपटात जरी आजवर कधीही न पाहिलेली लाल मातीतील अ‍ॅक्शनदृश्ये पाहायला मिळतील. सकस कथानकाला मुद्देसूद कथानकाची जोड आणि सहजसुंदर अभिनयाच्या साथीने सादर केलेली प्रेमकथा हे ‘नाद’चं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे संगीतकार पंकज पडघन यांनी गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. ‘डोळ्यांत तूच आहे…’, ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’, ‘नादखुळा डान्स करा रे…’ आणि ‘जीवाचे हाल…’ ही चारही गाणी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी येतात आणि मनाला भुरळ घालतात. अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची जोड हे या गाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आल्याने पडद्यावर चित्र पाहताना ते सुखावह वाटेल.
किरण गायकवाडची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आलेली निवड आणि त्याची सपना माने या नवोदित अभिनेत्रीसोबत जमलेली जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. किरण गायकवाडसाठी हा चित्रपट इमेज ब्रेकिंग ठरणारा असून, त्याने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले. ते म्हणाले की, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अचूक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. किरणसारखा तगडा अभिनेता मुख्य भूमिकेत असल्याने ‘नाद’ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. त्याला सपनाची सुरेख साथ लाभली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यातील गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालणारी असून, चित्रपटगृहातून बाहेर पडणारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण कलाकृती पाहिल्याचा आनंद पाहायला मिळेल अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली आहे. संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. किरण गायकवाड आणि सपना माने यांच्यासह यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केले असून, डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

0

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर मध्ये येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत आहे असे आज खासदार छत्रपती शाहू महाराज,आमदार सतेज पाटील,विधान परिषद गटनेता खासदार समन्वयक गिरीश फोंडे यांनी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या ८६ हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने २८ फेब्रुवारी व ७ मार्च २०२४ च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला. याच दिशेला जाणारे पर्यायी दोन महामार्ग असताना या अनावश्यक अशा शक्तिपीठ महामार्गाची योजना सरकारने केली. या महामार्गामुळे २७ हजार एकर जमीन १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. कोल्हापुरातील ५,२८१ एकर जमीन ही संपादित केली जाणार आहे. मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी हे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. ४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय निर्धार मेळावा घेऊन या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार झाला.
सर्वप्रथम कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ मार्च रोजी व नंतर १८ जून रोजी भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला होता. मंत्र्यांना कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस व जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलनाचा धसका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मीटिंग पार पडल्या.कोल्हापुरातील सहा तालुक्यांमध्ये या विरोधात जनजागृती मेळावे व रास्ता रोको आंदोलने झाली. एवढ्या सर्व गोष्टी घडत असताना देखील फक्त शब्दांची फिरवा फिरव करण्यापलीकडे महायुती सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही याबद्दल कोल्हापूर सहित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष खदखदत आहे.
आता महायुती सरकारचा कार्यकाळ संपत असताना आचारसंहिता ही दोन दिवसांमध्ये लागू होण्याची परिस्थिती असताना सरकार हे सवंग लोकप्रियतेसाठी वोट बँक नजरेसमोर ठेवून शेकडो निर्णय घेत मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा लावला आहे. सरकारची तिजोरी खाली असताना देखील सात लाख कोटीचे कर्ज राज्यावर असताना देखील सरकार जनतेतील आपली भ्रष्टाचारी प्रतिमा खोडून काढण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडत आहे. पण लाडक्या कंत्राटदारांचे हे सरकार शेतकऱ्याला मात्र सावत्र भावाची वागणूक देत आहे. शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाच्या जमिनी काढून व त्यांस आत्महत्येस प्रवृत्त करायला लावून शेतकरी महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकरी बहिणी या लाडक्या बहिणी नाहीत का ? असा सवाल शेतकरी करत आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी हे निर्णायक भूमिका घ्यायच्या तयारीत आहेत.
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये घ्यायचा निर्णय घेण्यात आला. सोमवार २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बारा वाजता ही परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते व महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.या परिषदेमध्ये खा. शाहू महाराज, आ.सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत, राजाराम सिंह , कृषी अभ्यासक योगेंद्र यादव, माजी आमदार संजय बाबा घाटगे, आ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, आ.अरुण लाड, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू बाबा आवळे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, माजी आमदार के पी पाटील , दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील, विजय देवणे, आर के पवार यासह बारा जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित असतील. तसेच खासदार शरदचंद्र पवार साहेब व शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले जाणार आहे.
अजून देखील वेळ गेलेली नाही आचारसंहितेपूर्वी हा महामार्ग रद्द केल्याची व भूमी संपादन देखील रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी. बारा जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी व इतरही शेतकरी यांच्या मनात त्या आमदारांबद्दल सहानुभूती असणे नैसर्गिक आहे. त्या सर्व आमदारांचे खासदारांचे आम्ही शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने आभार मानत आहोत व शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत राहावे अशी आशा खा. श्री. छत्रपती शाहू महाराज,आमदार सतेज पाटील,विधान परिषद गटनेता खासदार समन्वयक गिरीश फोंडे,सम्राट मोरे,शिवाजी मगदूम, आनंदा पाटील,प्रकाश पाटील, कृष्णात पाटील,प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे,सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, योगेश कुळवमोडे.,नितीन मगदूम,दादासो पाटील, युवराज कोईंगडे,मच्छिंद्र मुगडे,जालिंदर कुडाळकर, साताप्पा लोंढे ,तानाजी भोसले,आनंदा देसाई यांनी व्यक्त केली आहे.