Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 22

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

0

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे च्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहन सक्षम कार्यशाळा घेतली. यात बी.टेकच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत दोन एलेक्ट्रिक वाहन बनविले.घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नव उद्योगासाठी प्रेरित करण्याचे धोरण ठरविले आहे. या अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रिक वाहन डिझाईन करणे, बांधणी व चाचणी करणे इ. प्रशिक्षण देण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक वाहन बनवले व त्याची चाचणी देखील घेण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील हिरीकुडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन, समर्पित होऊन हा प्रोजेक्ट केला आहे.अशा कार्यशाळामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन, संचालक, विभाग प्रमुख, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

चौकट

यावेळी बोलताना अध्यक्ष संजय घोडावत यांनी उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण उमेदवार तयार करणे हे आमचे ध्येय आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी पेट्रोल व इलेक्ट्रिक वाहनांचे एकत्रीकरण कसे करता येईल यावर प्रयोग करावा असे सांगून विद्यार्थ्यांना त्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

0

विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ४ व ५ नोव्हेंबर २०२४ रोजी वारणा कोडोली येथे करण्यात आले. या स्पर्धेत सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांचा सहभाग होता, तसेच एकूण आठ संघांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत सातारा व सांगली संघांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संजय घोडावत स्कुलच्या संघाने सांगली संघासमोर ५२ धावांचे आव्हान ठेवले. घोडावत स्कुलच्या विजय कलालने २५ धावा, विन्यास भटने १६ धावा, तर विहान लड्डाने १० धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. लक्ष्याचा पाठलाग करताना सांगली संघ ४० धावांवर गारद झाला, त्यामुळे संजय घोडावत स्कूलने हा सामना १२ धावांनी जिंकला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
संजय घोडावत स्कूलच्या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार विहान लड्डा व उपकर्णधार विन्यास भट यांनी केले. संघात विजय कलाल, पंकज गोदेजा, साईराज पानसरे, क्षितिज जाधव, ऋणीत इदाते, श्लोक पाटील, मन ओसवाल, मनन ओसवाल, महेंद्र आरोरी, स्वराज सातपुते, अंश पटेल, तेजस शालगर, शौर्य पाटील, आणि आरुष रावत या खेळाडूंचा समावेश होता. संघाचे मार्गदर्शक प्रशिक्षक संदीप बिरनगे, आकाश कांबळे, अमोल वाडकर, आणि भावना पाटील हे होते. क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर यांची प्रेरणा मिळाली.संजय घोडावत स्कूलच्या क्रिकेट संघाच्या या यशाबद्दल अध्यक्ष श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य अस्कर अली यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या .

मंत्री मुश्रीफांच्या प्रचंड मताधिक्यासाठी ताकद द्या भूषण पाटील यांचे आवाहन

0

मंत्री मुश्रीफांच्या प्रचंड मताधिक्यासाठी ताकद द्या
भूषण पाटील यांचे आवाहन

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, हसन मुश्रीफांनी शेतकऱ्यांना दिलेले सर्व शब्द तंतोतंत पाळले

बेलवळे बुद्रुक, बाचणी येथे प्रचार सभांना प्रचंड गर्दी

बेलवळे बुद्रुक/प्रतिनिधी : विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते निंदानालस्ती, बदनामी, आरोप आणि टीकाटिपणीवर उतरले आहेत. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याएवढे काम राज्यात अन्य कोणीही केलेले नाही. त्यांच्या प्रचंड मताधिक्यासाठी ताकद द्या, असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील यांनी केले. खरंतर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. परंतु; विरोधक विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक लढवत आहेत, असेही ते म्हणाले.बेलवळे बुद्रुक ता. कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर सभेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे नेते प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ही निवडणूक राजवाडा विरुद्ध गावगाडा, राजा विरुद्ध रयत अशीच आहे. पुरोगामी कागल तालुक्याने यापूर्वी रयतेलाच प्राधान्य दिले आहे. याच रयतेने स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना शिखरावर पोहोचवले. त्याच पद्धतीने मंत्री हसन मुश्रीफ यांनाही शिखरावर पोहोचवले आहे. श्री मुश्रीफ जातीपातीचा चक्रव्यूह भेदून प्रचंड मताधिक्याने विजय होतील.
हसन मुश्रीफ म्हणाले, वंचित, उपेक्षित शोषित आणि पीडित यांच्या कल्याणाचा ध्यास हाच माझ्या राजकारण आणि समाजकारणाचा गाभा आहे. या अत्यंत वेगळ्या वळणावर असलेल्या निवडणुकीत जे जे मदतीसाठी धावून आले, त्यांचे उपकार हयातभर विसरणार नाही. सामाजिक जीवनात कधीच कुणाशी कायमचे वैरत्व, खुन्नस आणि शत्रुत्व धरले नाही. प्रत्येक माणूस माझ्याकडे माझ्या हातात जनतेने शक्ती दिली आहे, या भावनेने येत असतो. म्हणूनच मीही प्रत्येकाला खुल्या अंतकरणाने मदत करत आलो आहे.
यावेळी गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, विजय काळे, दत्ताजीराव देसाई, नारायण पाटील, उसेद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.

मुश्रीफांनी शेतकऱ्यांना दिलेले शब्द पाळले

शेतकऱ्यांचे नेते प्रा. जालंदर पाटील म्हणाले, मंत्री श्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलेले सर्व शब्द तंतोतंत पाळले आहेत. गतवर्षी ज्या साखर कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपयेपर्यंत दर दिला आहे. त्यांनी शंभर रुपये व तीन हजार रुपयांच्या वरती दर दिला आहे. त्यांनी पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यावेत म्हणून आम्ही जेव्हा मंत्री मुश्रीफ यांना घेरले होते, त्यावेळी त्यांनी कारखानदार आणि संघटनांच्यामध्ये मध्यस्थी करून हा शब्द पाळला. म्हणूनच अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही आलो आहोत. जातीपातीचे चक्रव्यूह भेदून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.

घोडावत विद्यापीठात टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन

0

घोडावत विद्यापीठात टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन

देश विदेशातील तज्ञांकडून मार्गदर्शन

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठात ११ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांसाठी ‘आत्मविश्वास, नवचैतन्य आणि भविष्यातील संधी’ या विषयावर प्रेरणादायी टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता कायदेविषयक तज्ञ साक्षर दुग्गल, ईवॉलविंग एक्स चे कार्यकारी व्यवस्थापक अमोल निटवे, सोशल सिंफनीचे संस्थापक नीरज वैद्य, रोबोटिक्स इंजिनीयर शौर्य भासिन, स्पेन देशातील पीपल संस्थेच्या संचालिका साथ्या ल्लूल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तज्ञांकडून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संधी, समाजातील बदल आणि तंत्रज्ञानाच्या प्रभाव, शाश्वत विकासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांशी सामना करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देशच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणे, नवीन दृष्टिकोन विकसित करून प्रेरणा देणे हा आहे.
आधुनिक युगात नेतृत्व, नाविन्य आणि आव्हानांचा स्वीकार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करेल असे कुलगुरू,प्रो. उद्धव भोसले म्हणाले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मास कम्युनिकेशन विभागातील प्रा.प्रियंका पाटील, प्रा.सुमित कदम, ग्लोबल सेलच्या अमृता हंदूर ,विद्यार्थिनी अनुराधा तिबिले व इतर विद्यार्थी प्रतिनिधी मेहनत घेत आहेत. यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

मतदाना दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

0

मतदाना दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

कोल्हापूर(जिमाका): विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणतीही आस्थापना, कंपन्या, संस्थामधील काम करणारे सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांना अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. याबाबत आस्थापनांनी जिल्हाधिकारी यांना लेखी अर्ज करुन सवलत प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.
शासनाने परिपत्रक प्रसारित केले असून त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) तरतुदीनुसार आदेश देण्यात आले आहेत. मतदाना दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी दिली नसल्यास तक्रारीसाठी स्वतंत्र दक्षता कक्ष स्थापन केला असून कामगार आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, ५७९, ई वॉर्ड, शाहूपूरी , व्यापारीपेठ, कोल्हापूर येथे व aclkolhapur@gmail.com या ईमेल वर अथवा पुढील मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्स ॲपवर ९१४६४७५०५० सर्व माहितीनिशी दाखल करु शकतात.

दुग्ध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले – चेअरमन अरुण डोंगळे

0

दुग्ध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले – चेअरमन अरुण डोंगळे

गोकुळमार्फत स्वर्गीय रविंद्र आपटे यांना श्रद्धांजली

कोल्‍हापूरप्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रविंद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय रविंद्र आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सन १९८६ पासून सलग ३५ वर्षे गोकुळचे संचालक आणि चार वर्ष अध्यक्ष असणारे स्व.रविंद्र आपटे हे सहकार व दुग्ध व्यवसाया तील राष्ट्रीय अभ्यासक होते त्यांच्या निधनाने दुग्ध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच गोकुळच्या जडणघडणी मोलाचे योगदान त्यांनी दिले. संघ हिताच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली होती. दूध उत्पादकांच्या समस्या ते सातत्याने मांडत होते, त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे गोकुळने चांगली प्रगती केली त्यांचे काम नेहमीच गोकुळ परिवाराच्या स्मरणात राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील -चुयेकर तसेच संघाचे अधिकारी डॉ.प्रकाश साळुंखे, शरद तुरंबेकर, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी यांनी मनोगत व्यक्त करून स्व. रविंद्र आपटे यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.तसेच संघाच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे हि स्व.आपटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महा.व्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी, राजू पाटील, प्रकाश शिंदे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

0

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता.करवीर) येथील हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष जगदीश चौगले यांनी केले. चौगले यांच्यासह युवराज पाटील, शंकर चौगुले, बाबुराव पाटील, बाबुराव बाचणकर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा मडीलगेकर, रविंद्र महाडेश्वर, बाजीराव गोंगाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील, गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ.सतेज पाटील म्हणाले, चौगले यांच्या या निर्णयाचा आनंद आहे. सर्वसामान्यांना आपला वाटणारा आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ देण्याची तुमची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. आ.ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.आ.ऋतुराज पाटील म्हणाले, गावच्या सर्वांगीण विकासासाठी गाव एकसंघ राहणे महत्वाचे आहे. ही भूमिका घेऊन चौगले यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे मला विधानसभेच्या विजयासाठी मोठे बळ मिळाले आहे.गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन गेल्या पाच वर्षात धडाडीने काम केले आहे. दक्षिणची जनता त्यांच्या पाठीशी असल्याने ते नक्की बाजी मारतील.
यावेळी गोकुळ संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, बिद्री कारखाना संचालक आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, जि. प. चे माजी सदस्य एकनाथ पाटील, सागर पाटील, एल. एस. किल्लेदार, पी. एम. पाटील, अशोक किल्लेदार यांच्यासह निगवे खालसामधील कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

0

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक बबन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी केला. बबन शिंदे व सहकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी बबन शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी काँग्रेससह घटकपक्षांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पक्षांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आ.ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते सक्रीय सहभागी होणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास बबन शिंदे यांनी व्यक्त केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, आरपीआय गवई गटाने दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. या पाठिंब्यामुळे आमची ताकद आणखी वाढली आहे. यानिमित्ताने समविचारी एकत्र येत असल्याचा आनंद आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीने नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. सामान्य जनतेचे हित आणि सर्वांगीण विकास हाच महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. याला जनतेतून मोठा पाठींबा मिळत असल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल.यावेळी टी. के. पाटील, पंडित चौगले, कृष्णात कांबळे, वरदान गागडे, हर्षवर्धन पासवान, केदार देवळेकर, गौरव शिंदे, ऋतिक आवळे, प्रकाश सुतार, सतीश कोळी, सुजल गोपकर, सुजात थोरात, विपुल शिंदे, हर्षद कांबळे, अथर्व कांबळे, अनुपम पांडे, शिवाजी कांबळे, हर्षद भोसले आदि उपस्थित होते.

घोडावत विद्यापीठाची सिंगापूर-मलेशिया अभ्यास सहल यशस्वी

0

घोडावत विद्यापीठाची सिंगापूर-मलेशिया अभ्यास सहल यशस्वी

अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठातील २६ विद्यार्थ्यांनी व्यवसाय संशोधनाच्या उद्देशाने नुकतीच सिंगापूर आणि मलेशिया येथील संशोधन केंद्रांना भेट देऊन अभ्यास सहल यशस्वी केली. विद्यापीठातील ग्लोबल सेलच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये मलेशिया येथील UCSI युनिव्हर्सिटीला भेट देण्यात आली. व्यवसाय संशोधनातील अद्यावत तंत्रज्ञाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली तसेच तेथे डेटा ऍनालीटीकस या विषयावर सर्टिफिकेट कोर्स घेण्यात आला. त्याच सोबत मलसिया स्टॉक एक्सचेंज Bursa मलेशिया येथे भेट देण्यात आली. स्टॉक एक्सचेंज च्या विषयावर शैक्षणिक सत्र घेण्यात आले. तेथील कामकाजाची व फायनान्सियल प्रॉडक्ट्स आणी सेक्युरिटी बद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. सिंगापूर येथे मरिना साऊथ पीअर येथे भेट देण्यात आली. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री आयात निर्यात याची सखोल माहिती मिळाली.
तसेच या देशातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना अंतरराष्ट्रीय औद्योगिक आणि शैक्षणिक संधींची माहिती मिळावी या उद्देशाने या पूर्वीही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दुबई या ठिकाणी शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन घोडावत विद्यापीठाकडून करण्यात आले होते.या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत प्रा.पूजा खोपकर होत्या. यासाठी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वास्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ.विवेक कायंदे, मॅनजमेंट विभागाच्या डीन डॉ.योगेश्वेरी गिरी आणि ग्लोबल सेल च्या अमृता हांडूर यांचे सहकार्य लाभले.

गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका : उद्धव ठाकरे यांचे आदमापूरातील सभेत आवाहन

0

गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका : उद्धव ठाकरे यांचे आदमापूरातील सभेत आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचंड गर्दीत प्रचार शुभारंभ संपन्न

गारगोटी/प्रतिनिधी : आपल्या अडीच वर्षांच्या काळात आपण जनतेच्या विकासाच्या योजना राबविल्या. मात्र या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नसल्याने आपलं सरकार विश्वासघाताने पाडलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रद्रोही विरोधात महाराष्ट्रप्रेमी अशी असून जनतेने या निवडणूकीत गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका, असे आवाहन शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राधानगरी- भुदरगड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचार शुभारंभ आज संपन्न झाला हा शुभारंभ आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील संत बाळूमामा मंदिरात करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. ठाकरे यांनी बोलताना मागील दोन निवडणूकांत ज्या आमदारांना जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांनीच जनतेचा विश्वासघात केला. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरुन नेणाऱ्यांच्या टोळीत राधानगरीचा आमदार सामील झाला हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या ४० जणांच्या टोळक्याला स्वाभिमानी जनताच आता घरी बसवणार असून या गद्दारांना गाडण्याची सुरुवात जनतेने राधानगरीतून करावी असे
श्री. ठाकरे म्हणाले, यंदा महाविकास आघाडीचे सरकार आणणारचं असून आपण राज्याला स्थिर सरकार देणार आहे. सध्याच्या टक्केवारीच्या सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे. आपल्या काळात महागाई वाढू न देता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवणार आहे. मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांची जाऊ तिथं खाऊ हीच प्रवृत्ती आहे. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर आपले सरकार बांधणार आहे. तर महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिला पोलिसांची भरती करून स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनची उभारणी करणार आहे असे सांगितले.
आम. सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून काम केलेल्यांनी स्वार्थासाठी त्यांचा विश्वासघात केला. ही गद्दारी राज्यातील स्वाभिमानी जनतेला रुचलेली नसून त्याचा परिणाम या विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. आजच्या सभेला झालेली गर्दी पाहता ही सभा के. पी. पाटील यांच्या प्रचाराची नसून विजयाची सभा आहे.
उमेदवार के. पी. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात करण्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांनी राधानगरीला दिला यातच आपल्या जीवनाचे सार्थक झाले. गद्दारांच्या यादीत विद्यमान आमदारांनी सामील होऊन राधानगरीचे नाव बदनाम करण्याचे पाप केले. पाटगाव धरणाचे पाणी अदानीला देणाऱ्या आबिटकरांना जनता यंदा पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी प्रकाश पाटील, संजयसिंह पाटील, विजयसिंह मोहिते, शरद पाडळकर यांनीही मनोगते व्यक्त केली. या सभेस खा. शाहू महाराज छत्रपती, अरुण दुधवाडकर, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, विजय देवणे, संजय पवार, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, हिंदूराव चौगले, शामराव देसाई, राहूल देसाई, अनिल घाटगे, जयवंतराव शिंपी, राजेश पाटील, आर. के. मोरे, सदाशिव चरापले, मुकुंदराव देसाई, पंडीत केणे, धनाजी देसाई, मधुकर देसाई, प्रा. किसन चौगले, अभिजित तायशेटे, धैर्यशील पाटील-कौलवकर, राजू शमनजी, विश्वनाथ कुंभार, उमेश भोईटे, सुरेश चौगले, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

चौकट

या प्रचार शुभारंभावेळी के. पी. यांच्या समर्थकांनी विविध घोषणांचे फलक सभास्थळी लावली होती. शिवसेनेत बंड झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन शिंदेंसेनेत गेलेल्या आमदारांत राधानगरीच्या विद्यमान आमदारांचाही समावेश होता. याला अनुसरुन लावलेल्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यातील पन्नास खोके, एकदम ओके आणि गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार के. पी. या घोषणा लक्षवेधी होत्या.

चौकट

सभेला येण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी ते आदमापूर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते सभास्थळी आले. त्यांच्या मोठ्या उपस्थितीने सभामंडप खचाखच भरुन गेला होता. अनेक कार्यकर्ते सभामंडपाच्या बाहेर उभारलेल्या स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण पाहत होते.

चौकट

या प्रचारसभेला मतदारसंघातून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात मशाल चिन्हाचा स्कार्फ घालून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी १० फूट उंचीचा आणि ३०० किलो वजनाचा फुलांचा हार आणला होता. हा हार क्रेनच्या सहाय्याने ठाकरे यांना घालण्यात आला.