कागल शहरात तीन हजार घरकुलांच्या पूर्ततेचे आत्मिक समाधान मोठे – नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन
गणेशनगर मधील घरकुलवासीयांना माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचा श्रावण महिन्यानिमित्त “हक्काचा आणि हक्काचा शिधा”
कागल/प्रतिनिधी : कागल शहरात घरे नसलेल्यांसाठी तीन हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आत्मिक समाधान मोठे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. बेघरांसाठी घरकुल योजना, रमाई आवास योजना व महाडाची योजना या माध्यमातून घरकुले पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.येथील गणेशनगर घरकुलामध्ये ३५० कुटुंबांना माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्यावतीने श्रावण महिन्यानिमित्त “श्रमाचा आणि हक्काचा शिधा” मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
आपल्या भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी, उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकात्वाची वयाची अट ६५ वरून ६० करण्यासाठी प्रयत्नशील आहे.ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ हे सदैव गोरगरिबांच्या पाठीशी राहणारे व त्यांच्या अडीअडचणी सोडविणारे नेतृत्व आहे.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, गोरगरीब जनता सुखाने राहिली पाहिजे, हा नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा ध्यास आहे. त्या तळमळीतूनच ते सदैव गोरगरिबांसाठी कार्यरत आहेत. मात्र, समरजीत घाटगे यांच्याकडे अजिबात दानत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.सौ सोनाली चव्हाण भावनिक भाषणात म्हणाल्या, बालपणातच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे बापाची माया मिळाली नाही. परंतु; घरकुलाच्या रूपाने कुटुंबाला जगण्याचेच छत्र मिळाले आणि मुश्रीफसाहेबांच्या रूपाने वडीलकिची माया मिळाली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात अश्रु तरळले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागलमधील एक हजार दोन घरकुले हा सबंध महाराष्ट्रात आणि देशात ही नावाजला जाणारा गृहप्रकल्प आहे. सुरुवातीला राजकीय विद्वेषापोटी समरजीत घाटगे हा प्रकल्प बंद पाडण्यासाठीच प्रयत्न करत होते. समरजीत घाटगे हे गोरगरिबांच्या सुखदुःखात कधीही समरस होत नाहीत. अशक्यप्राय वाटणारा हा प्रकल्प नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मोठ्या हिमतीने पूर्णत्वाला नेला आहे.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, पत्रकार अतुल जोशी, संदीप भुरले, ॲड. संग्राम गुरव, सौरभ पाटील, संजय चितारी, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, अर्जुन नाईक, महेश गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
त्यांचे डोळेच पांढरे झाले…..!
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, कागलमध्ये गोरगरीब जनतेलाही स्वतःच्या हक्काचा निवारा असावा, हा नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा कळवळला होता. त्यातूनच त्यांनी बेघरांसाठी ३००० घरकुले बांधून पूर्ण केली. आज या घरकुलांमध्ये जनता सुखाने नांदत आहे. कोट्यावधींची कामे केलेली असतानाही समरजीत घाटगे बोर मारण्यासारखी स्टंटबाजी करून त्याला गालबोट लावत आहेत. आठवड्यापूर्वीच ते बोअरच्या निमित्ताने आले होते. एवढी सुंदर घरकुले बघून त्यांचे डोळेच पांढरे झाले, असेही ते म्हणाले.स्वागत रोहित घाटगे यांनी केले. प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. सूत्रसंचालन यांनी केले आभार आसिफ मकानदार यांनी मानले.