आजरा – चंदगड मधील मानवी वस्तीतील हत्तींचा वावर रोखण्यासाठी उपाययोजना करा – आमदार सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींना रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, किती नुकसान भरपाई दिली असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला.आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढला असून शेतीतील पिकांचे व साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर हल्ल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीतील हत्तींचा वावर रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. तसेच या तालुक्यांमध्ये हत्तींमुळे झालेल्या नुकसानीमुळे किती लोकांना भरपाई मिळाली असा प्रश्नही त्यांनी विचारला.
यावर दिलेल्या लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या दोन्ही तालुक्यात सध्या सात हत्तीचा कळप दिसून आला आहे. मात्र मागील पाच वर्षात हत्तीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात अनुक्रमे ७७.३४ लाख ५२.४९ लाख आणि ६९.४३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वन्य हत्तींचा वावर रोखण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये वन्य प्राणी प्रतिबंधक चर खोदणे, वनक्षेत्रात पिण्याचे पाण्याची व्यवस्था, वन कर्मचाऱ्यांची गस्त, ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्याने लक्ष ठेवणे, गवती कुरणांचा विकास, प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित आवाज करणारे यंत्र वापरणे, वन्यजीव बचाव दलाची स्थापना, ८ ते १० कर्मचाऱ्यांचा हाकारा गट उपाययोजना करण्यात आल्या असल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.