कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली
कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय स्थलांतराचा डाव हाणून पाडू. – माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस आयुक्तालयाची मागणी होत असताना अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. अशा परिस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाचा हा डाव हाणून पाडू असा इशारा माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ४० लाखाच्या आसपास आहे. यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आयुक्तालय असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरूआहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच कोल्हापुरातून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय स्थलांतरित होणार नाही अशी ग्वाही सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिली होती. सध्या पोलीस आयुक्तालय तर नाहीच पण आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आहे ते कार्यालय पुण्याला हलवल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस मनुष्यबळांची प्रचंड कमतरता भासणार आहे. गेल्या काही दिवसातील गुन्हेगारी बघता पर राज्यातील गुन्हेगारी टोळ्या येथे येऊन गुन्हे करत आहेत. माफियाराज फोफावत आहे. संघटित गुन्हेगारी, सावकारी, दरोडे, महिलांवरील अत्याचार अशा गुन्ह्यांचा आलेख वाढतच आहे. या गुन्ह्यांना पायबंध घालने आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालय किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय असेल तरच अशा गुन्हांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. अन्यथा त्याच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होणार आहे. यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय कोल्हापुरातच राहणे खूप महत्त्वाचे आहे.
कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय कोल्हापुरातून स्थलांतरित करण्यास आमचा ठाम विरोध आहे. सध्याच्या सरकारचा हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
चौकट
कोल्हापूरचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न – माजी गृहराज्यमंत्रीआमदार सतेज पाटील
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यापार उद्योग व्यवसाय याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळेच पाच जिल्ह्यासाठी कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. हे कार्यालय स्थलांतरित करून कोल्हापूरचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.