Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यामन की बात उपक्रमानं देशात वैचारीक आणि विकासात्मक क्रांती, खासदार धनंजय महाडिक...

मन की बात उपक्रमानं देशात वैचारीक आणि विकासात्मक क्रांती, खासदार धनंजय महाडिक यांची भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश-विदेशात लोकप्रिय ठरलेल्या मन की बात उपक्रमानं देशात वैचारीक आणि विकासात्मक क्रांती, खासदार धनंजय महाडिक यांची भावना

कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा उपक्रम देश-विदेशात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलाय. जागतिक स्तरावरही या उपक्रमाची नोंद घेण्यात आलीय. मन की बात या उपक्रमातून, पंतप्रधान मोदी विविध विषयावर जनतेशी संवाद साधतात. तसंच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांचा उल्लेख करून, आढावा घेऊन त्यांना प्रोत्साहित करतात. विकासाचे नवनवीन मुद्दे मांडणार्‍या या उपक्रमानं देशात वैचारीक आणि विकासात्मक बदल होत आहेत, अशी भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. देशवासियांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत तो आणखी व्यापक आणि यशस्वी करावा, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सुत्रं हाती घेतली. त्यानंतर ३ ऑक्टोबर पासून त्यांनी मन की बात, हा देशवासियांशी संवाद साधणारा उपक्रम विजयादशमीच्या मुहुर्तावर सुरू केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी यांचा हा उपक्रम, आकाशवाणी आणि दुरदर्शनच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जातो. देशात घडणार्‍या विविध घटना, विविध विकासाचे उपक्रम यासह सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या प्रेरणादायी यशोगाथांचं विवेचन, पंतप्रधान मोदी या उपक्रमातून करतात. आज मन की बातचा शंभरावा भाग प्रसारित झाला. त्यामध्ये मोदी देशवासियांना कोणता संदेश देतात, याबद्दल मोठी उत्कंठा होती. खासदार धनंजय महाडिक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी आज मन की बात या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रसारणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. बाबर हॉस्पिटल जवळच्या बुध्द विहार मैदानावर, खासदार महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण करून, सामूहिक रित्या या वैचारिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या उपक्रमाची खासदार महाडिक यांनी मुक्तकंठानं प्रशंसा केली. सेल्फी विथ डॉटर या उपक्रमातून बेटी बचाव, पर्यटन, जल साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, सार्वजनिक स्वच्छता अशा अभियानाला पंतप्रधान मोदी यांनी चालना दिली. पंतप्रधान मोदी यांची संवेदनशिलता, दुरदृष्टी आणि सशक्त नेत्याची छबी जनतेमध्ये आता रुजली आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केलं. कोरोना कालावधीत मोदी यांनी देशवासियांना केलेली मदत, त्यांनी राबवलेले स्वच्छता अभियान प्रचंड यशस्वी ठरले. जनधन योजनेसह मोदी यांनी देशात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेखही खासदार महाडिक यांनी आपल्या भाषणात केला. एकूणच मोदी यांच्या मन की बात या उपक्रमानं , देशात आमुलाग्र बदल होत असल्याचे निरीक्षण खासदार महाडिक यांनी या उपक्रमाच्या निमित्तानं नोंदवले. कोल्हापूर जिल्हयासह संपूर्ण देशात आज एकाचवेळी ८० लाख ठिकाणी हा कार्यक्रम पाहीला गेला. तसेच शंभर कोटी पेक्षा अधिक देशवासियांनी आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतलाय, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. बुध्दविहार याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला तीन हजारापेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी माजी नगरसेविका स्मिता माने, मारूती माने, शिवाजीराव पाटील, भुषण पाटील, डॉ. राजकुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही या कार्यक्रमाचं ठिकठिकाणी सामूहिक प्रक्षेपण करण्यात आलं होतं. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी जरगनगर इथं चिकोडे ग्रंथालयात, मन की बात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणार्या सरल ऍप संबंधी माहिती देवून, चिकोडे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे जनतेला आवाहन केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष वल्लभ देसाई यांच्यावतीनं फुलेवाडी रिंगरोड इथल्या बाळूमामा तालीम मंडळातही आज अनेकांनी मन की बात कार्यक्रम एकत्र रित्या पाहिला, ऐकला. त्यातून पंतप्रधान मोदी यांची विकासाची दृष्टी आणि नेतृत्व याबाबत सर्वांनीच समाधान व्यक्त केले. राजारामपुरीतील सामाजिक कार्यकर्ते रहिम सनदी, असिया सनदी, दिलीप बोंद्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं. इथेही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून मन की बात कार्यक्रमाचा लाभ घेतला. देशातील सर्व प्रमुख आकाशवाणी आणि एफएम केंद्रांनी, मान्यवरांच्या उपस्थितीत मन की बात या कार्यक्रमाचं नागरिकांसाठी आयोजन केलं होतं. कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या ९०.४ मँगो एफएमच्या कार्यालयात, संचालक आशिष कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाचं देशपातळीवरील महत्व स्पष्ट केले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, प्राध्यापिका कविता गगराणी, अनिल निगडे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव यादव, रवी कुलकर्णी, सतेज औंधकर, सिमा मकोटे, प्रमोद खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments