देशभक्त पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक आणि संविधान संकुलाचे १ मे रोजी भूमिपूजन
भालकी मठाचे बसवलिंग पट्टदेवरु यांच्या हस्ते भूमिपूजन
संविधानिक मूल्यानुसार नव समाजनिर्मितीची प्रयोगशाळा साकारणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : थोर स्वातंत्र्यसेनानी, भारतीय संविधान सभेचे सदस्य, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते पद्मश्री डॉ . रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे भव्य स्मारक आणि संविधान संकुल अण्णांच्या जन्म गावी – निमशिरगाव येथे साकारत असून या स्मारकाचे भूमिपूजन भालकी मठाचे परमपूज्य बसवलिंग पट्टदेवरु यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र दिनी सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता होत आहे .देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा, द भारतातील २१ संस्थानाचे संघराज्यात विलीनीकरण,भारतीय संविधानाची निर्मिती, ग्रामीण भागाचा विकास, सहकार, शिक्षण, हरितक्रांती अशा विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठे रचनात्मक कार्य केले . त्यांच्या सर्वव्यापी कार्याचे दर्शन घडवणारे स्मारक अद्यापपर्यंत नव्हते . भारतीय संविधान सभेचे सदस्य असणाऱ्या व आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत असाधारण योगदान देणाऱ्या या महापुरुषाचे विचारकार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत . नव्या पिढीपुढे अण्णांच्या कार्याचे समग्र दर्शन घडवण्यासाठी तसेच संविधानविषयक जागरूकता व संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी रत्नाप्पाण्णांचे भव्य स्मारक व संविधान संकुलाची निर्मिती करण्याचा मनोदय त्यांच्या अनुयायांनी केला व या स्वप्नाची परिपूर्ती महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने स्मारकाच्या भूमिपूजनाच्या भव्य समारंभाने संपन्न होत आहे .
या स्मारकामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रदर्शन, संविधान दालन ,देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, २०० आसन क्षमतेचे सभागृह , लोकशाही प्रशिक्षण केंद्र, युवा प्रशिक्षण केंद्र , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , ग्रंथालय, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र , आरोग्य संवर्धन केंद्र,पुरुष व महिलांचे स्वतंत्र निवास स्थान, व्यायामशाळा, डिजिटल प्रदर्शने , संग्रहालय , विविध दालने व इतर आवश्यक त्या सर्व सुविधा ,असे या स्मारकाचे भव्य स्वरूप आहे .
स्मारकासाठी स्मारकासाठी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या सौ . रजनीताई विश्वनाथ मगदूम यांनी जागा व २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.तसेच अण्णाप्रेमी नागरिक व कार्यकर्त्यांनी १५ लाखाहून अधिक रकमेचा निधी घोषित केला आहे . स्मारकासाठी अंदाजे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे . उर्वरित निधी संकलित करण्यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत .जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उद्योगपती तसेच दानशूर व्यक्तींनी या स्मारकासाठी मदत करावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या स्मारकाच्या माध्यमातून संविधानावर आधारित नवा भारत घडविण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे .हे स्मारक नवकल्पना, नवोपक्रम, प्रशिक्षण, विचारमंथन, लोक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, उद्यमशीलता व समाज बांधणीची एक प्रयोगशाळा ठरेल. अशा प्रकारचे स्मारक पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच साकारत असून त्याचा वैचारिक व सामाजिक जडणघडणीसाठी पायाभूत स्वरूपाचा उपयोग होईल असे समितीस वाटते .
मा . राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , खासदार धनंजय महाडिक , आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे , आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , आमदार प्रकाश आवाडे , आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील , अशोक माने, पुंडलिकराव जाधव, पी एम पाटील , अशोक स्वामी, राजवर्धन निंबाळकर, माधवराव घाटगे , अनिलराव यादव , पद्माकर पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये स्मारकाचे भूमिपूजन संपन्न होत आहे . या भूमिपूजन समारंभास नागरिकांनी व अण्णाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार स्मारक समितीच्या अध्यक्षा सौ रजनीताई विश्वनाथ मगदूम व डॉ.विश्वनाथ मगदूम यांनी केले आहे .