प्रारुप मतदार याद्यातील घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका – भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी अन्यथा न्यायालयात जाणार – राहूल चिकोडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १६/०२/२०२१ रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या. या यादयांवर आक्षेप घेण्यासाठी दिनांक २३/०२/२०२१ हा अंतिम दिवस होता. प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या प्रारूप यादयांत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे लक्षात आले आहे. हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांच्या प्रारुप यादीत आली आहेत. या सर्व सुरु असलेल्या मतदार याद्यांतील घोळाबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे तक्रार दाखल करण्यात आली.
दिनांक १८ व २३ रोजी भाजपाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून या मतदार याद्यांतील सुरु असलेल्या गंभीर त्रुटी बाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. हा गोंधळ केवळ एक /दोन प्रभागांफुरता मर्यादित नसून शहरातील बहुतेक सर्वच प्रभागाच्या प्रारूप याद्यात हे घडले आहे. उदा. प्र.क्र.३२ मध्ये २१६३, प्र.क्र.३३ मध्ये सुमारे २१०० तर प्र.क्र.४८ मध्ये सुमारे १८०० नावांवर हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत तसेच गोंधळाचा अवाका पाहता प्रशासनाने सध्याच्या प्रारूप याद्या पूर्णपणे रद्द करून नवीन प्रारूप याद्या कराव्यात अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व हरकतीचे निरसन केले जाईल असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप याद्यांची दुरुस्ती होणे अशक्य आहे. तसेच याद्यातील एवढे प्रचंड गोंधळ अजूनही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे अनेक नागरिक हरकती घेण्यापासूनही वंचित राहिले आहेत. यातून निवडणूक आयोगाच्या ‘Free And Fare Elections’ या मार्गदर्शक तत्वाची अवहेलना होण्याचा संभव असून अनेक नागरिक त्यांच्या मतदानाच्या मूलभूत हक्कापासूनही वंचित राहण्याचा धोका आहे. सबब या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो की, दिनांक १६/०२/२०२१ रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्यात व पुन्हा नव्या प्रारूप याद्या तयार कराव्यात, प्रारूप याद्यांवर हरकत दाखल करण्याची मुदत नवीन याद्या जाहीर झाल्याच्या दिवसापासून पुढे सुट्टीचे दिवस सोडून किमान दहा (१०) दिवस ठेवावी, प्रारूप याद्यांचे प्रत्येक वॉर्ड स्तरावर जाहीर वाचन करावे व नागरिकांपर्यंत त्याचा कार्यकम पोहचवावा, प्रारूप याद्या करण्यात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी.
वरील विषयाबाबतचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे सहीचे तक्रारीचे निवेदन आज महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे पाठवण्यात आले. त्याचबरोबर मुंबई येथे निवडणूक आयोगाच्या ऑफ़िसमध्ये या तक्रारीची पत्र देण्यात येणार आहे.
या सर्व याद्यातील घोळ मिटेपर्यँत निवडणूक घेऊ नये अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी दिला.शिवाय संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राऊत यांनीही ही मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
चौकाट –
याद्यातील घोळ तांत्रीक त्रुटी आहे की मानवनिर्मित आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरीकातही आहे .