कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भा.ज.प.ची अवस्था दयनीय – ए. वाय. पाटील- जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भा.ज.पा. पक्षाची अवस्था दयनीय झाली असून, येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या पक्षास जिल्ह्यामध्ये दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल. गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यावर विकास कामामध्ये अन्याय केला, त्याचे हे त्या पक्षाला मिळालेले फळ आहे. जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी एक थेंबही न अडवणे, जिल्ह्याच्या रस्त्याची खराब अवस्था, गोरगरीब शेतकरी व सामान्य माणसाचा विश्वासघात या गोष्टीही भाजपच्या पराभवास जबाबदार आहेत.
सबब जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने १५८ ग्रामपंचायतमध्ये सत्ता मिळविली व १,४४६ सदस्य निवडून आले. शिवसेना व काँग्रेस पक्षानेही घवघवीत यश मिळवले आहे. महाविकास आघाडीची संख्या ६० टक्के इतकी होते. भाजप २० टक्के पेक्षा कमी राहिला आहे.
दरम्यान, भाजप ग्रामीणचे अध्यक्ष “मै गिरा तो भी टांग उपर” या पद्धतीने विधान करीत आहेत. त्यांचा निकालाच्या दुसर्याच दिवशी म्हणजेच १९ जानेवारी रोजी वाढदिवस होता. आमचे नेते नामदार मुश्रीफसाहेब यांनी त्यांचा वाढदिवस आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निर्णयावर त्यांच्यावर टिकास्त्र करू नका, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. कारण, वाढदिवस वर्षातून एक दिवस येत असतो. त्या दिवशी कोणालाही दुःख, यातना, वेदना होऊ नयेत, ही त्यांची भावना होती.
या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, शाहू साखर कारखान्याच्या पट्ट्यातील १५ गावांमध्ये एकाही गावांमध्ये भाजपची सत्ता आली नाही. आजपर्यंत राजे गटाचे प्रभावक्षेत्र होते, त्या ठिकाणी ही अवस्था आणि भा.ज.प.च्या विजयाच्या बाता करता? त्यांना वाढदिवसाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून शुभेच्छा.