Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यास्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा पंचगंगेचे प्रदूषण...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा – पालकमंत्री सतेज पाटील

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर निधी खर्च करावा पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 1 : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषणबाबत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार,  प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
इचलकंरजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, श्री. आंधळे यांनी पंचगंगा प्रदूषण कमी करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. उदय गायकवाड यांनी उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी याबाबत बैठक घेतली आहे. यासंदर्भात कायमस्वरूपी आराखडा करण्याबाबत सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या 96 एमएलडी पाण्यापैकी 91 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल. क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का याबाबतचा आराखडा नगरपालिकेने तयार करावा.
नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायतींनीही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्राप्त झालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा, अशी सूचना देवून पालकमंत्री पुढे म्हणाले, पंचगंगेच्या आजूबाजूला उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव अशा गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत.महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तपासणीच्या सूचना श्री. आंधळे यांना दिल्या. झेडएलडी करण्याबाबत वीज वापर तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दूध पिशव्यांबाबत इको सिस्टीमसाठी नियोजन करा.
घरोघरी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूध पोहचवण्यात येत असते. या पिशव्यांबाबत इको सिस्टीम काय करता येईल याबाबत दूध उत्पादक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्याकडून नियोजन आराखडा घ्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. तसेच ‘आय इट प्लास्टिक’ असे घोषवाक्य घेवून महापालिकेने नाविन्यपूर्णमधून पथदर्शी प्रकल्प राबवावा. तसा प्रस्ताव पाठवा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी केली.
बैठकीला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, इचलकंरजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर,प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments