भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

कोल्हापूर/प्रमोद पाटील : “चांगभलं” च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला आहे. आधुनिकतेच्या युगात जिथे वाहनांचा वेग वाढला आहे, तिथे आजही चैत्र यात्रेच्या निमित्ताने एक जुनी, निखळ आणि तितकीच जिव्हाळ्याची परंपरा कायम आहे. ही परंपरा आहे—आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सोबत घेऊन, बैलगाडीतून जोतिबाच्या दर्शनाला येण्याची.
बैलगाड्यांचा थाट आणि भक्तीचा प्रवास शेतकरी, कष्टकरी आणि गोर-गरीब जनतेचे कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनासाठी आजही अनेक कुटुंबं शेकडो मैलांचा प्रवास बैलगाडीतून पूर्ण करतात. या प्रवासात थकवा नसतो, असतो तो केवळ देवाच्या दर्शनाचा ओढ. या यात्रेसाठी बैलांना खास नटवण्यात येते; शिंगे रंगवलेली, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि कपाळावर रेशमी गोंडे अशा थाटात हे ‘लवाजमे’ जोतिबा डोंगराच्या दिशेने कूच करतात. गाड्यांनाही आकर्षक रंगरंगोटी करून सजवले जाते. दोन-तीन दिवसांचा खडतर प्रवास करून आज दुपारपासून या बैलगाड्या डोंगरावर दाखल होऊ लागल्या आहेत.
सहज सेवा ट्रस्ट: मुक्या प्राण्यांची मायेने सेवा
जोतिबा डोंगरावर कडक उन्हाचा तडाखा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. अशा परिस्थितीत शेकडो मैल चालून आलेल्या या बैलांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय होणे अत्यंत कठीण असते. हीच गरज ओळखून ‘सहज सेवा ट्रस्ट’ गेल्या २५ वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे.केवळ भक्तांसाठी ‘अन्नछत्र’ न चालवता, ‘भूतदया’ हाच खरा धर्म मानून ट्रस्टतर्फे येणाऱ्या बैलांचीही विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये: कपरी पेंड आणि भुस्सा: बैलांच्या शक्तीसाठी पौष्टिक आहार,चाऱ्याची सोय: हिरवा चारा आणि कोरडे गवत.
२५ वर्षांचे अखंड व्रत
सहज सेवा ट्रस्टने ही सेवा केवळ एक उपक्रम म्हणून नव्हे, तर कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. डोंगरावर भर उन्हात बैलांना चारा मिळणे कठीण असते, हा संवेदनशील विचार करून ही ‘भूतदया सेवा’ मनोभावे राबवली जाते. यामुळेच ही प्राचीन परंपरा आजही टिकून आहे.परंपरा आणि सेवा यांचा हा संगम जोतिबाच्या चैत्र यात्रेचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करतो. भक्तांचा उत्साह आणि मुक्या प्राण्यांप्रती असलेली ही कृतज्ञता खरोखरच कौतुकास्पद आहे.ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

