Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यास्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील - शशिकांत खोत

स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील – शशिकांत खोत

स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील – शशिकांत खोत

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाडिकांनी महिलांची व्यवस्था करण्याची भाषा वापरली. मात्र या निवडणुकीत स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कणेरीवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.खोत पुढे म्हणाले, महाडिकांनी घरात खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे असताना कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेने 2019 ला अमल महाडिकांना पराभूत केले. पाच वर्षात मतदारसंघात न फिरकणा-या महाडिकांना निवडणुक आल्यावर जनतेची आठवण होते. महाडिकांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे महाडिकांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही.
आमदारकीच्या काळात ऋतुराज पाटील यांनी कोट्यवधीची कामे केली. ब वर्ग तीर्थक्षेत्रातून कणेरीसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. आपल्या कामातून आमदार ऋतुराज पाटील यांनी कार्यतत्पर आमदार अशी ओळख निर्माण केली असून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणूया. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मतदारसंघातील जनतेने प्रत्येक निवडणुकीत आम्हाला साथ दिली आहे. जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मतदारसंघात भरीव काम करु शकलो. मतदारसंघाच्या गतिमान विकासासाठी युवा, महिला, जेष्ठ नागरीक, शेतक-यांनी मला पाठबळ द्यावे.
माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खोत म्हणाले, जलजीवन योजनेच्या टाकीचे काम खासगी जागेत सुरु असल्याचा आरोप तानाजी पाटील यांनी केला होता. मात्र ही जागा खासगी नसून ग्रामपंचायतीची असल्याचा सातबारा तानाजी पाटील यांच्या घरावर चिकटवा. लोकांच्या हिताच्या कामात अडथळा आणणा-यांना खड्यासारखे बाजूला करा.शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळेखे म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांचा जनसंपर्क आणि कामामुळे त्यांना दक्षिणमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ऋतुराज हे दक्षिणचे परमनंट आमदार असणार आहेत.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनिल मोदी, डॉ.अमर वारके यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत ,सेवा संस्थेचे चेअरमन अप्पासाहेब मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव म्हाकवे, अमर मोरे, समाधान सोनुले, अर्जुन इंगळे, विश्वास शिंदे, विजय मोरे, अमित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

महाडिकांचे “ते” पत्र शशिकांत खोत यांनी दाखवले वाचून
जलजीवन योजना रद्द व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्र लिहिले होते. शशिकांत खोत यांनी सभेत ते पत्र वाचून दाखवत महाडिकांचा खरा चेहरा उघड केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments