जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावर अन्नछत्र आज २१ ते २४ एप्रिल सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : २००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २४ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन अन्नछत्राची सुरुवात केली. या गोष्टीला आज दोन तपे झाली, म्हणजेच सर्वसाधारण बारा वर्षानंतर एक पिढी बदलते असे म्हणतात, २००१ साली ४५ ते ५० वर्षाचे तरुण आज सत्तरीच्या पलीकडे गेलेले आहेत पण दोन पिढ्या बदलल्या तरी आजही २००१ च्या जिद्दीने व पुढील पिढीच्या हातात हात घालून या वर्षाचे अन्नछत्र पहिल्याच उत्साहाने चालू राहणार आहे. पुढील वर्षी आपण रौप्य महोत्सवी अन्नछत्र करणार आहोत.अशी माहिती विश्वस्त संमती मिरजे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
महाराष्ट्रामध्ये देव देवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा.
जोतिबाची चैत्रामध्ये होणारी ही यात्रा प्रमुख मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख भाविक यात्रेकरू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
या यात्रेसाठी आपल्या भागातून सासन काठ्या घेऊन यायची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे आजही अनेक मानाच्या सासनकाठ्या घेऊन शेकडो मैल पायी चालत, चांगभलचा गजर करीत भक्तगण ज्योतिबा डोंगरावर येतात. आजच्या आधुनिक काळातही आपल्या गावातून आपल्या परिवारासह बैलगाडीतून डोंगरावर येणारे भाविक ही आहेत, अशा अनेक परंपरा या यात्रेमधून अजूनही सांभाळल्या जातात.
लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या ज्योतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली २३ वर्षे सातत्याने ज्योतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालविण्यात येते.
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दिनांक २१ ते २४ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस व रात्र सुरू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी त्याचप्रमाणे यावर्षी शासनाने व पोलीस प्रशासनाने चार चाकी वाहनांचे तळ अन्नछत्राच्या ठिकाणी म्हणजेच गायमुखावर केलेले आहे या ठिकाणी अंदाजे २००० चाकी वाहनांचे पार्किंग करण्यात आलेले आहे व त्यामुळे सदर चार चाकी वाहनातून येणारा अधिकचा भक्तगण हा या अन्नछत्राचा नक्कीच लाभ घेईल. त्यामुळे यावर्षी अडीच लाखावर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
यात्रे करिता डोंगरावर प्रमुख दोन मार्गाने कोणत्या ना कोणत्या वाहनाने यात्रेकरू येतात. त्याचबरोबर कुशिरे ते गायमुख मार्गे ज्योतिबा डोंगरावर चालत येण्याचा हा पारंपरिक मार्ग आजही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मार्गावरून बहुसंख्य यात्रेकरू व सासन काठ्या डोंगरावर येतात. सध्या ज्योतिबा तीर्थक्षेत्रावर जाणारा मुख्य मार्ग हा पाण्याचा टाक या भागात खचलेला असल्यामुळे तो रस्ता मागील वर्षाच्या यात्रेपासून बंद आहे त्यामुळे सर्व वाहतुक ही गायमुखमार्गेच होणार आहे.
वाहनांनी येणारे यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखावर येतात. त्यांच्या वाहनासाठी गायमुख परिसरामध्ये वाहनतळ तयार करण्यात आला आहे. तेथे लाईटची व्यवस्था ही करण्यात आली आहे. आपापल्या गावातून येणारे यात्रेकरू कधीही रात्री डोंगरावर पोहोचत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सोयी करता सहज सेवा चे अन्नछत्र २४ तास सुरू असते.
यात्रा काळात चार दिवस यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, वन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग, विद्युत विभाग, त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था चे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहसेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येते. ते जेवण पाकीट बंद करून या विभागातील सर्वांना पोचवण्याचे काम पोलीस दल व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करते.
अन्नछत्रांमध्ये यात्रेकरूंना जेवण्यासाठी १०८ बाय १३८ म्हणजेच पंधरा हजार चौरस फुटांचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्या करिता वेगवेगळे मंडप उभारण्यात आलेले आहेत.
येणाऱ्या भाविकांना रक्तदानाचे महत्त्व कळावे, रक्तदानाबद्दलची भीती कमी व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील सरकारी दवाखाना म्हणजे सीपीआर व महात्मा गांधी हॉस्पिटल पारगाव यांच्या सहकार्याने गायमुख परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी डॉक्टर पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटल च्या सहकार्याने येणाऱ्या भक्तांच्या डोळ्यांची मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे.
गायमुख परिसरामध्ये यात्रेकरूंना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता शासनाच्या आरोग्य विभागामार्फत २४ तास वैद्यकीय सेवा व एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.
पंधरा हजार किलो बासमती तांदूळ, तीन हजार किलो तूर डाळ, सहा हजार किलो रवा, दहा हजार किलो साखर, चारशे पन्नास डबे तेल, सात हजार लिटर दूध, ३०० किलो चहा पावडर, ३०० किलो मूग, तीनशे किलो काळा घेवडा, ३००० किलो बटाटा, चार हजार किलो कांदा, २०० किलो लसूण, ट्रक भरून भाजी, चार टन लाकूड, २०० गॅस सिलेंडर तसेच चटणी व इतर मसाले इत्यादी सामान नीट वाट करून तयार ठेवण्यात आलेले आहे. चारशे स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत. अन्नछत्राची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यात्रेकरूंना सहज सेवा ट्रस्ट तर्फे या अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे.
ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थाना सदर उपक्रमास मदत करावयाची आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्ट ३९८ आशिष चेंबर्स, बसंत बहार सिनेमा समोर, स्टेट बँक कोषागर शाखा, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९८९०९४९०९४ या नंबर वर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती.