Friday, June 27, 2025
spot_img
Home Blog Page 8

गिरीष फोंडे यांच्यावरील कारवाई ही तर हुकूमशाही आमदार सतेज पाटील

0

गिरीष फोंडे यांच्यावरील कारवाई ही तर हुकूमशाही
आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे केले आहे. फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सुद्बुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर मनपा आयुक्त यांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकूमशाही अनुभवत असल्याचे पाटील म्हणाले. . गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे. पन्नासहुन अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे. शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत. पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत. जातीअंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे. अशा व्यक्तीविरोधात सरकार सुद्बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे. कोल्हापूर ही लढवय्याची भूमी आहे. अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज या सरकारला बंद करता येणार नाही. कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल, या शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला

कॉल्पोस्कोपी आणि पॅथॉलॉजी व स्त्रीरोग संघटनेच्या वतीने तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

0

कॉल्पोस्कोपी आणि पॅथॉलॉजी व स्त्रीरोग संघटनेच्या वतीने तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी: इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजी आणि कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीने गर्भाशय मुख कॅन्सर आणि त्याला प्रतिबंधित करणारी साधने म्हणजे कॉल्पोस्कोपीवरील सतराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ ते २० एप्रिल दरम्यान ही परिषद हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने १८ एप्रिल रोजी वैद्यकीय कार्यशाळा डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल येथे घेण्यात येणार आहे. यामध्ये कॉल्पोस्कोपी आणि त्यांच्या द्वारे करण्यात येणार्‍या शस्त्रक्रिया यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गर्भाशय मुख कॅन्सरचे प्रमाण स्त्रीयांमध्ये वाढले असून हा आजार दुसर्‍या क्रमांकावर आहे. हा कर्करोग टाळण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. हा कर्करोग होण्यापूर्वी याचे निदान करता येते आणि त्याचे उपचार पिशवी न काढताही करता येतात.हा कॅन्सर होऊ नये म्हणून मुली आणि स्त्रियांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. मुलांना पण ही लस देता येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक माहिती वर या परिषदेत चर्चा होणार आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर एचपीव्ही या व्हायरसमुळे होतो.एखाद्या स्त्रीला याची लागण झाली आहे का, हे साध्या तपासणीत कळून येते. याबद्दलचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजीच्या अध्यक्षा डॉ. लीला दिगूमूर्ती ,सचिव डॉ. पिनका वामसी खजिनदार डॉ. श्वेता बालानी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन शनिवारी दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलचे प्रमुख आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. नीरजा भाटला यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.डॉ विजय झुतशी, डॉ. सरिता शामसुंदर, डॉ. भाग्यलक्ष्मी नाईक,यांच्यासह तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई येथील डॉ. उषा सरैया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर येथील डॉ.सुमन सरदेसाई माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती परिषदेच्या आयोजक आणि अध्यक्षा
डॉ. भारती अभ्यंकर ,सचिव डॉ.बबन पाटील, खजिनदार डॉ.दीपाली पाटील,तसेच कोल्हापूर स्त्री रोग व प्रसूती शास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनिषी नागावकर,सचिव डॉ. रणजीत किल्लेदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच
या परिषदेच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सदरचा कार्यक्रम होणार आहे. या परिसंवादास सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन : उद्योजक सत्यजित जाधव व राजेंद्र कुरणे यांची माहिती

0

बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन : उद्योजक सत्यजित जाधव व राजेंद्र कुरणे यांची माहिती

विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषकाचे बक्षीस : चालू वर्षातील सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेला बुधवारी दि. २ एप्रिल २०२५ पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव व राजेंद्र कुरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीन २ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ व उत्तरेश्वर प्रसादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात होणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ (अ) व रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सकाळी आठ वाजता होणार आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 16 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.

चित्रकार शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आ

0

चित्रकार शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोल्हापूर/प्रतिनिधी : चित्रपटसृष्टीने नेहमीच विविध रोमॅंटीक कथांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर अधिराज्य हे रोमॅंटीक कथांनीच गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथांसह प्रयोग केले आहेत, परंतू प्रेमकथा नेहमीच चित्रपटांचा आत्मा राहिल्या आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना, संपुर्ण फॅमिलीला आकर्षित करणारा प्रकार म्हणून रोमॅंटीक सिनेमाकडे पाहिलं जातं.
असाच रोमँटिक चित्रपट ‘सजना’ आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
‘सजना’ सिनेमाच्या पोस्टरवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी आपण पाहू शकतो जे पाण्यात रोमँटिक पोज मधे आहेत.
धोत्रेंच्या चित्रांसारखंच हे पोस्टरसुद्धा एक सुंदर पेंटिंगच आहे. जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे जिवलग मित्र प्रमोद कुर्लेकर यांनी तयार केले आहे. ज्यात दोन प्रेमी पाण्यांवर तरंगत आहे, आजूबाजूला असलेल्या संपूर्ण जगाचा जणू त्यांना विसर पडलाय; “सजना” सिनेमाच्या टिझर मध्येही ह्याच जोडप्याला आपण रोमँटिक संवाद साधताना पाहू शकतो.
विशेष म्हणजे टीझर मधील प्रत्येक शॉट लक्षवेधी असून पेंटींग प्रमाणेच बारकाईने चितारलेले वाटतात, तरुण फ्रेश जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे त्यांचा चेहरा टिझर मध्ये अद्याप पूर्णपणे उघड केला गेला नाही आहे. टिझर मध्ये सुंदर पेंटीग सारख्या व्हीजुअल्स सोबतच कर्णमधूर असं ओंकारस्वरूपचं संगीत आणि सोनू निगमचा आवाज आहे जे नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ही प्रेमकथा असून गावातील सुंदर दृश्य आणखी शोभा वाढवते. टिझरच्या शेवटी प्रेमापोटी एकमेकांमध्ये गुंतलेल्या जोडप्याला कोणते परिणाम भोगावे लागतात याबद्दल हि छोटी झलक पहायला मिळते. त्यामुळे नक्की चित्रपटाची कथा काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. टिझर मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘सजना’ सिनेमा २३ मे २०२५ ला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘सजना’ चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. शशिकांत धोत्रे हे एक संवेदनशील चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच आणि आता ते ‘सजना’ पासुन चित्रपट क्षेत्रात एका संवेदनशील रोमॅंटीक कथेच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांनी काढलेली चित्रं आज देश-विदेशात लाखोंच्या संख्येनं रसिकांची दाद मिळवतायत, अशाच प्रकारे त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे.
ॲक्शन चित्रपटांच्या गर्दीत नवोदित प्रेमाच्या कथा पाहणे नेहमीच वेगळा अणि सुखद अनुभव देऊन जातात, त्यामुळे सुमधूर संगीतानी सजलेला रोमॅंटीक ‘सजना’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक होतील आणि हा भव्य दिव्य मराठी चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी मोठ्या पाड्यावरच आवर्जून घ्यावा
‘सजना’ २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

0

कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट
-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया’ उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी स्टडीजमधील प्राध्यापक डॉ. विश्वजीत खोत, संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि राजाराम कॉलेजच्या डॉ. अश्विनी साळुंखे यांनी हे संशोधन केले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४९ वे पेटंट असून या संशोधनामुळे भविष्यात कर्करोगावर अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.
सध्या कर्करोगावर किरणोपचार, रासायनिक उपचार आणि शस्त्रक्रिया यांसारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र या उपचार पद्धतीमध्ये आरोग्यदायी पेशींवर होणारे दुष्परिणाम, उपचारांसाठी होणारा मोठा खर्च आणि मर्यादित प्रभाव यांसारख्या अडचणी आढळतात. मात्र, चुंबकीय नॅनो कणांच्या मदतीने अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होऊ शकते.
डॉ. विश्वजीत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि डॉ. अश्विनी साळुंखे (भौतिकशास्त्र विभाग, राजाराम कॉलेज) यांनी रासायनिक पद्धतीचा वापर करून अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांचे संश्लेषण केले. या कणांचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट कर्करोग पेशींशी जोडले जातात आणि बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने उष्णता निर्माण करतात. या प्रक्रियेमुळे ४० ते ४८ अंश सेल्सियस तापमान निर्माण होते, ज्यामुळे कर्करोग पेशी नष्ट होतात. हे संशोधन कर्करोग उपचारातील नवी क्रांती ठरण्याची शक्यता असून, भविष्यात अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे. या संशोधनासाठी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने ३ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन !

0

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने ३ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कोल्हापूर/प्रतिनिधी : सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे उत्सवाचे हे ५ वे वर्ष असून हे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) या ठिकाणी ३ ते ६ एप्रिल या कालावधीत होतील. यात प्रामुख्याने ४ एप्रिलला सकाळी १० वाजता श्रीराम मूर्तीपूजन, तर ६ एप्रिल या दिवशी सकाळी १०.१० वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, सकाळी ११ वाजता प्रसाद वाटप, तर दुपारी ४ वाजता अतिभव्य अशी ऐतिहासिक शोभायात्रा निघेल. यात मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपारिक वाद्ये, उंट, घोडे यांचा समावेश असेल. या प्रसंगी १ हजार १०० हनुमान चालिसा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने १ एप्रिल या दिवशी राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये गुरुवार, ३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता मिरजकर तिकटी येथील अंधशाळेला दैनंदिन साहित्य वाटप, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या समवेत सामूहिक भोजन होईल. ४ एप्रिलला रात्री ७ वाजता ‘शिव शंभू आणि स्वधर्म’ यांवर आंतरराष्ट्रीय लेखक आणि व्याख्याते श्री. ऋत्विक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. शनिवार, ५ एप्रिल या दिवशी रात्री ७ वाजता ३५० व्या शिवराज्याभिषेक गीताचे रचनाकार युवाशाहीर चंद्रकांत माने यांचा शाहिरी कार्यक्रम, तसेच भव्यदिव्य शिवराज्याभिषेक देखावा होईल. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. अनिल चोरगे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. विकास जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, श्री. विशाल पाटील, हिंदू महासेभेचे श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीला माने, रेखा दुधाने, रश्मी साळोखे उपस्थित होत्या.
श्रीरामनवमी उत्सव समितीतील पदाधिकारी अध्यक्ष श्री. विशाल पाटील, उपाध्यक्ष श्री. पियुष वाडकर, कार्याध्यक्ष श्री. सचिन भोळे, सचिव श्री. सुनील पाटील, उपसचिव – श्री. गणेश लाड, खचिनदार – श्री. अनिल चोरगे, सहखजिनदार- श्री. अमोल पाटील उपस्थित होते.

हिंदु राष्ट्रच्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ’सामूहिक हनुमान चालीसा पठण

0

हिंदु राष्ट्रच्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ’सामूहिक हनुमान चालीसा पठण’

: कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ !

कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेच्या वतीने आज देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी असलेल्या श्री हनुमान मंदिरे, श्रीराम मंदिरे यांसह अन्य शेकडो ठिकाणी २० हजारांहून भाविक, साधक, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. तसेच विविध या पठणाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात १०० हून अधिक ठिकाणी एक हजारांहून अधिक हिंदूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
२९ मार्च या दिवशी शनिगोचर अर्थात् श्री शनिदेवानी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री हनुमान चालिसा पठणाच्या वेळी श्री हनुमंत आणि श्री शनिदेव यांच्या चरणी हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेकांनी आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना अशा उपक्रमांतून ऊर्जा मिळाल्याचे मनोगत भाविकांनी व्यक्त केले.

किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या ‘ पोरी आम्ही मराठी पोरी’ला लाभतोय उदंड प्रतिसाद

0

किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या ‘ पोरी आम्ही मराठी पोरी’ला लाभतोय उदंड प्रतिसाद

शातिर द बिगिनिग मराठी चित्रपट येत्या ९ मे रोजी होणार प्रदर्शित

रायगड/प्रतिनिधी : सध्या चर्चेत असलेल्या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट शातिर द बिगिनिग चे दमदार गीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगडावर तब्बल २०० कलाकारांच्या सहभागाने या भव्य गीताचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सावित्रीच्या लेकी आम्ही, शिवबाच्या तलवारी, पोरी आम्ही मराठी पोरी… असे बोल असलेल्या या दमदार मराठमोळ्या गाण्याला समाज माध्यमांमधून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या गीतामधून मराठी महिलांच्या कर्तृत्वाची गाथा आणि त्यापासून मराठी पोरींना मिळणारी प्रेरणा दर्शविण्यात आली आहे.
वैभव देशमुख या चित्रपटाचे गीतकार असून रोहित नागभिडे यांचे संगीत आहे. विख्यात गायिका वैशाली सामंत यांनी या गाण्यांना स्वरसाज चढविला आहे.
शातिर द बिगिनिग या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पटकथा सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे.
या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी शातिर द बिगिनिग हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला !

0

झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला !

कोल्हापूर/प्रतिनिधी : झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले . पोस्टर पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर तसेच आणखी काही बालकलाकार दिसत आहेत. चित्रपटात या सर्वांची भूमिका एकदम दमदार असणार आहे हे नक्की.
आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या यशाची कहाणी लिहताना माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते हा तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
‘आता थांबायचं नाय!’ या सिनेमाच्या पोस्टरवर सर्वांच्या चेहऱ्यावर आपण हसू आणि काहीतरी मिळवल्याचा , विजयाचा आनंद पाहू शकतो* पण त्या हसण्यामागे किती संघर्ष आहे हे येत्या १ मे ला सिनेमागृहात कळेल. चित्रपटाची गोष्ट नक्की काय असणार, चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेप्रेमींना मल्टिस्टारर चित्रपटाचं वेड आहे, त्यात खूप दिवसांनी प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित सिनेमा येणार असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरणार आहे. ‘आता थांबायचं नाय!’ हा सिनेमा भावनिक आणि मनोरंजक असल्याबरोबरच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित ,उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया निर्मित* मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत : शिवरूप सूर्यकांत गायकवाड

0

परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत : शिवरूप सूर्यकांत गायकवाड

नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांचा करण्यात आला सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या करविर नगरीचे तीन सुपूत्र १२३ दिवसात पायी ३५०० किलोमिटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले आहेत. या मध्ये सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत मायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे. तसेच यापूर्वी नर्मदा परिक्रमा पुर्ण केलेल्या इतर परिक्रमावासीयांचा सहज सेवा ट्रस्टच्या वतीने आज परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. आहे.
१८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही नर्मदा परिक्रमा यात्रा या तिघांनी सुरू केली होती. या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून सुरू झाली पुन्हा ती ओंकारेश्वर येथे संपली तर दक्षिण तट आणि उत्तर तट अशा दोन विभागात ही परिक्रमा करण्यात आली. या परिक्रमेचा शुल पाणी जंगल हा भाग लांब अंतराचा होता. हे तिघे दररोज २० किलोमीटर पायी चालत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कन्यापूजनाने करण्यात आली.त्याच वेळी वरील परिक्रमावासी त्यांचे अनुभव ही कथन करणार आहेत.सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमोरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनी आपले अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितले.
यावेळी शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी आपले अनुभव सांगताना असे सांगितले की, नर्मदे हर चा जयघोष करवासा वाटला कारण अजूनही नर्मदा मैय्या डोळया समोरन जात नाही. जिचं प्रथम दर्शन, तिच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही तटावर असणारे गावे, मंदिरे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्‌या कथा… शूलपाणी जंगलातील पायी सफर, दाट अरण्यातील अनुभव, वाटेत भेटलेले परिक्रमावासी… या सगळ्‌याच आठवणींचा एक कोलाज मनामध्ये भरुन गेला आहे. चार महिन्याच्या परिक्रमेत आलेले अनुभव असे सांगत बसलो तर किती रात्री आणि किती दिवस असे जातील याची मोजदाद नाही. परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत. मैय्याची पवित्रता मनातील अहंकार धुवुन टाकणारी आहे. याची जाणिव प्रत्येक वळणावर होत होती. पाठीवरच सामान, हातात काठी, अंगावर श्वेत वस्त्र लेवून फक्त चालत रहायचं. मुक्कामाच्या ठिक़ाणी कधी जेवण मिळायचं कधी स्वत:ला बनवावं लागायचं… बालभोग अर्थात नाष्ता बहुतेकदा मिळायचा. पण जेव्हा मिळायचा नाही तेव्हा कुणी ना कुणीतरी, कठल्या ना कूठल्या ना कुठल्या रुपात येवून नाष्ता द्‌‌‌यायचा. हे सगळे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. नर्मदा परिक्रमेचा हा पायी ३२०० किलोमीटरचा प्रवास माझ्याकडून मैय्या ने करुन घेतला असा अनुभव शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी कथन करताना सांगितले.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी बोलताना सूर्यकांत गायकवाड हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. परिक्रमा पूर्ण करून गप्प बसणार नाही संघटनेची व्याप्ती वाढवेल आणि इतरांनाही मार्गदर्शन करेल असे उद्गार सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी सूर्यकांत गायकवाड यांच्या विषयी काढले. यावेळी मिरजे यांनी बोलताना त्यांच्यासोबत केलेल्या यात्रांचा अनुभव सांगितला.
ही परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे एक पार भक्ती आणि श्रद्धा आवश्यक आहे. या जोरावरच त्यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे.असेही
सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे म्हणाले.
यावेळी चंद्रकांत कडोलकर,सिद्धु लकार, बंडोपंत चव्हाण अविनाश बोकील, डॉ. प्रदीप कुलकर्णी, धैर्यशील पाटील,श्री. वसंत घाडगे, गजानन कापरे संजय जोशी, माणिक जोशी, बाळासाहेब निपाणीकर, ज्योत्स्ना डासाळकर, रवींद्र कुलकर्णी, रोहिणी कापरे, दिनेश लिंगारे, ललिता पाटील, ओंकार गाडगीळ, विश्वास माळी, अविनाश कळंत्रे, उदय कुलकर्णी, सुनिता नकाते. आदी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मत्ति मिरजे,प्रमोद पाटील,किरण शहा,अरविंद परमार यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.वसंतराव चौगुले पतसंस्थेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.प्रसन्न मालिकेर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रास्ताविक निर्मिती ॲड एजन्सीचे अनंत खासबागदार यांनी केले.आभार प्रमोद पाटील यांनी मानले.मा.नर्मदेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली