राष्ट्रवादीची राज्यात उच्चांकी सभासद नोंदणी करा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभासद नोंदणी व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात
कागल/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरु आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी राज्यात उच्चांकी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.कागलमध्ये मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीम व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते.
भाषणात श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, दर तीन वर्षाने कोणत्याही राजकीय पक्षाची सभासद नोंदणी होत असते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही मोहीम सुरू आहे. व्यक्तीपेक्षा पक्षीय संघटनेला महत्त्व आहे. म्हणूनच उच्चांकी अशी नोंदणी करा. या उच्चांकी नोंदणीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिकावर फडकवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चौकट –
राज्यपाल कोशारींचा निषेध
निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान संतापजनक आहे. त्यानी त्यांच्या वक्तव्यातून शिवरायांचे अवमूल्यनच केले आहे. त्याबद्दल या मेळाव्यात राज्यपाल श्री. कोशारी यांचा निषेधाचा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत झाला.
चौकट
मतभेद संपवून गावे समृद्ध बनवा
भाषणात श्री. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांनो आपआपसातील मतभेद मिटवा आणि विकास कार्याला वाहून घ्या. संघटितपणे एक दिलाने विकास कार्याला वाहून घ्याल तरच गावे समृद्ध होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सत्ता ही गोरगरिबांसाठी असते, हे सिद्ध करून दाखविले आहे. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून प्रभावीपणे राबविण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा.
कार्याध्यक्ष अनिल साळुंखे म्हणाले, पक्षीय संहीतेप्रमाणे विविध २६ सेल स्थापन करून काम करणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, समाज जीवनात संघटना महत्त्वाची असते. म्हणून पक्षीय संघटना मजबूत करा.
स्वागत व प्रास्ताविक भाषणात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विविध सामाजिक प्रश्नांवर अग्रभागी राहून काम केले आहे. हे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी बहुजनांच्या पर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कोल्हापूर बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे आदी प्रमुख उपस्थित होते.
तसेच विकास पाटील, संजय चितारी, रणजित सुर्यवंशी, मनीषा पाटील, रिना घोरपडे, निलेश शिंदे, राहुल पाटील, बाबासाहेब सांगले, रणजित पोवार, विशाल कुंभार, प्रवीणकुमार कांबळे, डॉ इंद्रजित पाटील, सुरेश शेळके, मदन पलंगे, गिरीश कुलकर्णी,राजेंद्र पाटील, संदीप जाधव, इकबाल नाईकवडी, राजेंद्र माने, संदीप तोडकर, नेताजी मोरे, सतीश घाडगे, हणमंत मेंडके, सुरेश शिंदे, शंकर संकपाळ, चंद्रकांत कांबळे, दिगंबर परीट, अझरुद्दीन बालेखान आदी सेलचे अध्यक्ष हेही व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार संजय चितारी यांनी मानले.