केडीसीसी बँकेची पगारदारांना ३० लाखांची विमा सुरक्षा
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विमा हप्त्याचा धनादेश प्रदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे खातेदार असलेल्या सर्वच पगारदार – नोकरदारांना बँकेने ३० लाख रुपयांची विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. राष्ट्रीय कृत कंपनी असलेल्या न्यू इंडिया ऍशूरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोनच्या सहयोगातून बँकेने अवघ्या तीनशे रुपयांच्या हप्त्यात ही योजना सुरु केली आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटीचा ६० लाख रुपयांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विमा कंपनीकडे देण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात अशा विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करीत बँकेने १७ हजार पगारदारांच्या विमा सुरक्षेपोटी ६० लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडे दिला. उर्वरित १३ हजार पगारदारांच्या विम्यापोटीची रक्कम दुसर्या हप्त्यात १५ मार्चपर्यंत दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, धकाधकीच्या जीवनात अशी विमासुरक्षा आवश्यकच आहे. योजनेला पगारदाराकडुन उदंड प्रतिसाद मिळाला आहे. उर्वरित पगारदार खातेदारांनीही या योजनेचा तातडीने लाभ घ्यावा.या पॉलिसीमध्ये शिक्षक पगारदारासह, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, साखर कारखान्याचे कामगार, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, केडरचे सचिव, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
चौकट……
तर एक कोटी रुपयांची विमासुरक्षा!
योजनेत समाविष्ट विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अगर कायमचे अपंगत्व आल्यास ३० लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. एक अवयव निकामी झाल्यास अगर ५० टक्के अपंगत्व आल्यास १५ लाख रुपये विमा भरपाई मिळणार आहे. विमा धारकाच्या दोन अपत्यांना पन्नास हजारांपर्यंत शैक्षणिक मदतही या योजनेअंतर्गत मिळणार आहे. ५० हजारांपेक्षा अधिक पगारदाराची खाती बँकेकडे झाल्यास त्यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. तसेच त्यांच्या हप्त्याचा निम्मा हिस्सा बँक भरेल, असेही श्री. मुश्रीफ यांनी जाहीर केले.
यावेळी बँकेच्या संचालक मंडळातील पी.जी.शिंदे, आमदार राजेश पाटील,
अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरिडकर,
भैय्या माने, अनिल पाटील, माजी खासदार निवेदिता माने, विलासराव
गाताडे, असिफ फरास, आर.के.पोवार श्रीमती उदयानीदेवी साळुखे या
सदस्यांसह न्यू इंडिया ऍशूरन्सचे डीजीएम रुद्राशिष रॉय, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक जी. भुवनेश्वरी तसेंच बँक कर्मचारी युनियने प्रतिनिधी भगवान पाटील, दिलीप लोखंडे, रणजित पाटील व सचिव संघटनेचे संभाजीराव चाबूक आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.